लेख ताज्या बातम्या

अशोक मुळ्ये काका : एक जबरदस्त भन्नाट अवलिया!

By: योगेश वसंत त्रिवेदी

“नमस्कार! या बरं झालं तुम्ही आलात. मी फक्त कळवलं. मला मेसेज पाठवता येत नाही. ते काम कल्पना आणि शेखर करताहेत. महेशही करतोय मदत. बरं, खाली चहाची व्यवस्था केली आहे. चहा प्यायलात कां? जा पहिल्यांदा चहा घेऊन या. ही खारी घ्या. गिरगावातली आहे. साखर पण आहे त्यात. हां, शुगर फ्री शुगर. ३ ते ४ चहापान. मग चार वाजता आपला कार्यक्रम सुरु. ए बाळा, तो पडदा बरोबर लाव. लाईट बरोबर लागला पाहिजे. बॅनर बरोबर आहे नां? मुद्दामच लिहिलंय ‘अध्यक्ष’ नसलेलं माझं पत्रकार संमेलन. झंझट नको. सगळं मी करतोय. माझ्या मनाप्रमाणे. कुणाकडून पैसा घेऊन खिशात टाकणारा नाही. व्यवहार चोख. हां, श्रीरंग, बरं झालं बाबा वेळेवर आलास. कार्यक्रम वेळेवर सुरु झाला पाहिजे.”

अशा पद्धतीने एकच पांढऱ्या शुभ्र कपड्यातली व्यक्ती हातात एक पिशवी नाचवत बोलत असते ती म्हणजे अशोक मुळ्ये काका! अशोक मुळ्ये काका हे एक प्रथितयश रंगकर्मी म्हणून ओळखले जातात. जसे नाट्यक्षेत्रात विविध रंगांच्या छटा असतात, तद्वतच पत्रकारिता, साहित्य, न्यायव्यवस्था, प्रशासन, राजकारण अशा सर्वच क्षेत्रांत विविध छटा आहेत आणि या सगळ्यांमध्ये सहज वावर असलेल्या या अवलियाचं नाव म्हणजे मुळ्ये काका.

अशोक मुळ्ये काकांनी ‘अध्यक्ष नसलेलं पत्रकार संमेलन’ भरविलं. यात पत्रकारितेतील साहित्य, राजकारण, नाट्य, चित्रपट, गुन्हेगारी अशा क्षेत्रांत काम करणाऱ्या विविधांगी पत्रकारांना बोलावलं होतं. एक अनोखा उपक्रम – अध्यक्ष नकोच, सगळं मीच, माझ्या पद्धतीने. हेच त्यांच्या स्वतंत्र शैलीचं वैशिष्ट्य.

“सूर्य, चंद्र, भरती, ओहोटी आणि विजय वैद्य कुणासाठी थांबत नाही,” असं ठणकावून सांगणारे विजयकुमार दत्तात्रय वैद्य – जे जव्हार संस्थानिक काकी वैद्य यांचे चिरंजीव – यांनी १४ सप्टेंबर २०२४ रोजी जगाचा निरोप घेतला. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे निस्सीम भक्त, राजकीय विश्लेषक, पत्रकार विजय वैद्य यांच्या कार्याची आठवण आज मुळ्ये काकांमधून वारंवार येते.

मी उबाठाचा कट्टर कार्यकर्ता आहे, पण भाजपवालेही माझ्यावर प्रेम करतात, असं मुळ्ये काका विनोदाने सांगतात. (उबाठा म्हणजे एकनाथ शिंदेंच्या गटात न गेलेली शिवसेना – शिवसेना [उद्धव बाळासाहेब ठाकरे]). अशोक मुळ्ये काका आणि विजय वैद्य या दोघांत असणाऱ्या विलक्षण साधर्म्याचा उल्लेख मी मुद्दाम करत आहे. हे दोघेही अठ्ठ्याऐंशी वर्षांचे, अविवाहित (मुळ्ये काका) किंवा विवाहित (विजय वैद्य), पण दोघांचेही कामाचे झपाटलेपण एकसारखेच!

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात ‘अध्यक्ष नसलेले’ पत्रकार संमेलन आयोजित करणे हे मुळ्ये काकांचं वेगळेपण दाखवणारे ठळक उदाहरण. ‘सगळे बाण, सगळी शस्त्रे एका भात्यात’ राहतील असा भाता मुळ्ये काकांचाच असू शकतो. कारण दोन पत्रकार एकत्र राहणं अवघड – हे वास्तव आहे. पण मुळ्ये काकांच्या प्रेमळ आणि प्रामाणिक स्वभावामुळे न्यायमूर्तीसुद्धा त्यांच्या बोलावणीला येतात.

न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांनी सांगितलं की, “बाबांनी सांगितलं आहे की अशोकच्या कार्यक्रमाला न चुकता जा. कारण तो एक पैसाही खात नाही.” हेच मुळ्ये काकांचं खरेपण. शुभ्र पांढऱ्या विजारीत खोवलेला पांढरा शर्ट, दोन्ही हातावरून दुमडलेले बाही, डोळ्यांवर चष्मा आणि आवाजात जरब – हेच मुळ्ये काकांचं ब्रँडिंग.

अभिजीत देसाईंनी ‘लोकप्रभा’त त्यांच्यावर “पांढरा दहशतवादी” नावाचा लेख लिहिला होता. उपस्थित पत्रकार, संपादक, विश्लेषक, न्यायमूर्ती यांनी त्यांची उपस्थिती लावून या लेखाचं सार्थक केलं. कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी अनेकांना त्यांनी फोन करून खास शैलीत आमंत्रण दिलं – “एकटेच या, जेवल्याशिवाय जायचं नाही!”

महेश म्हात्रे, कल्पना राणे, शेखर जोशी यांनी त्यांचं तांत्रिक काम सांभाळलं. महेश म्हात्रेंना त्याच दिवशी अत्रे पुरस्कार मिळाला म्हणून “मला सत्कारार्थी मिळाला” असं सांगून, न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आलं.

प्रसन्न जोशी, संजीव साबडे, श्रीरंग भावे, डॉ. शिल्पा मालंडकर, विद्या करलगीकर – सर्वजण मुळ्ये काकांच्या प्रेमात वावरले. जेवणाचा बेत श्रीखंडपुरीसह पूर्ण मराठमोळा आणि वाढप्याची भूमिकाही मुळ्ये काकांनी स्वतः पार पाडली.

कार्यक्रमात दिलेलं योगदान – ₹५०,००० – रंगमंचावरच सचिन सावंत यांच्या हातात सुपूर्त केलं. सगळं पारदर्शक. पारंपरिक कलाकार, समीक्षक यांचा विशेष सत्कार. पुणे, नाशिक, कोकण, संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले रंगकर्मी आणि पत्रकार.

एक्क्याऐंशी वर्षांचे असूनही उद्धव ठाकरे यांच्या सत्काराला नम्र नकार देणारे आणि “मी फक्त एक फूल घेतो” म्हणणारे अशोक मुळ्ये काका म्हणजे वास्तवात जगणारा, प्रामाणिक, जबरदस्त भन्नाट अवलिया.

झाले बहु, होतील बहु, परंतु अशोक मुळ्ये काका म्हणजे अशोक मुळ्ये काकाच. मला त्यांच्यात विजय वैद्य यांचीच छबी दिसते. दोघेही स्वतःच्याच मस्तीत जगणारे. अशा माणसांचं आयुष्य उदंड असावं, त्यांना ठणठणीत आरोग्य लाभावं आणि अशाच प्रकारे ते मार्गदर्शन करत राहावेत, हीच प्रार्थना.

जय महाराष्ट्र!
– योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१
(लेखक – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक)

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज