X: @therajkaran
मुंबई: मेट्रो-3 प्रकल्प हा काळाच्या नव्या वाहतूक व्यवस्था गरज लक्षात घेऊन उभारला जात आहे. मात्र हे करताना मुंबई शहराचे वय, क्षमता यांचा पूर्ण विचार करून, ऐतिहासिक हेरिटेज वास्तू, ऐतिहासिक बांधकामे यांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. यामुळे मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होतील. दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी लक्षणीयरित्या कमी होईल. येत्या एप्रिल-2024 मध्ये पहिला टप्पा सुरू होईल, अशी ग्वाही मेट्रो -कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी येथे दिली.
मुंबईतील मेट्रो प्रकल्प गतीने पुढे जाण्यातील उशीर, हा न्यायालयातील प्रकरणे, तसेच कारशेड जागेला झालेला विरोध यामुळे झाला. उशीर झाला की प्रकल्प खर्च वाढतो असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई मराठी पत्रकार संघात संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील झुंजार पत्रकार के. अप्पा पेंडसे व्याख्यानाचे विचारपुष्प गुंफताना ‘मुंबईतील मेट्रोची सद्य स्थिती, आणि भविष्यातील मेट्रोचे लोकांना होणारे फायदे,या विषयावर त्या बोलत होत्या.
श्रीमती भिडे, यावेळी मुंबईतील समग्र मेट्रो प्रकल्प कामांच्या प्रगतीची माहिती देताना म्हणाल्या, तीन बाजूंनी समुद्र, त्यामुळे मर्यादित जमीन, लोकसंख्या प्रमाणात सुरक्षित आरामदायक प्रवास सुविधा निर्माण करणे आवश्यक होते. उपनगरी लोकल, बेस्ट, खासगी वाहने यासोबतच आता ३५७. कि.मी. इतक्या क्षेत्रात मेट्रो रेल सुविधा होते आहे. सध्या ६६.५५ कि.मी. काम पूर्ण झाले आहे. दक्षिण मुंबईतून सुरू होणारा मेट्रो -३ प्रकल्प हा ३३.५ कि.मी.लांबीचा असून एमएमआरसीच्या अंतर्गत आहे. यामध्ये केंद्र सरकारचाही सहभाग आहे. यातील २७ पैकी २६ स्थानके ही जमिनीखाली असतील. या मेट्रो वाहतूकीला सर्व मेट्रो जोडल्या जातील. मेट्रो तीन मुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होईल.