मुंबई

उद्धव सेनेच्या मुंबईतील राजकीय ताकदीपुढे भाजपची शरणागती: सिनेट निवडणूक पुढे ढकलली

Twitter : @vivekbhavsar

मुंबई :

शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पाडून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केल्यानंतर देखील मुंबईत शिवसेनेचा पराभव करणे शक्य नाही, याची जाणीव झालेल्या भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याचे धाडस केलेले नाही. आता तर त्यांनी मुंबई विद्यापीठावरील युवा सेनेचे वर्चस्व मोडीत काढणे अशक्य असल्याचे लक्षात येताच सिनेट पदासाठी सुरू झालेली निवडणूक प्रक्रिया गुरुवारी रात्री अचानक एक पत्र काढून रद्द करत अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली. याचा निषेध करताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे, युवा सेनेचे आदित्य थके आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अमोल मातेले यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या दहा पदांसाठी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा युवा सेनेने पटकावल्या होत्या. भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा वरचष्मा संपवण्यात शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना यश आले होते. आता देखील तोच कित्ता गिरवला जाईल, अशी भीती भारतीय जनता पक्षाला होती. त्यामुळेच भाजपने या निवडणुकीपासून पळ काढला असावा, अशी प्रतिक्रिया युवासेना आणि मनसेकडून व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यावेळी त्यांनी सुमारे 30 हजार पदवीधरांची नोंदणी करून घेतली होती. त्यामुळे मनसेनेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सिनेटच्या या निवडणुकीत मनवि सेनेला चांगला विजय मिळाला असता. निवडणूक प्रक्रिया अचानक रद्द करून ती पुढे ढकलण्यात आल्यामुळे मनवि सेना संतप्त झाली आहे. अमित ठाकरे हे कुलपती आणि राज्याचे कुलगुरू रमेश बैस यांची शनिवारी भेट घेऊन सिनेटच्या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणी करणार आहेत.

आदित्य ठाकरे म्हणाले की, सुमारे सव्वा लाख पदवीधर विद्यार्थी सिनेटच्या या निवडणुकीत मतदान करतात. युवा सेनेने बोगस मतदार शोधून मतदार यादी 95 हजारावर आणली होती. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती, 10 सप्टेंबरला मतदान होते, इच्छुकांनी अर्ज भरले होते. निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असताना ती मध्येच थांबवणे, हे आजपर्यंत कधी झाले नाही. मग आताच हा निर्णय का घेण्यात आला? कोणाचा दबाव होता? असे प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.

(File photo)

मुंबई विद्यापीठाचे कार्यक्षेत्र अगदी पालघरपासून ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग पर्यंत पसरले आहे. ज्याच्याकडे पदवी प्रमाणपत्र असते, अशा मतदारांची नोंद करून घेतली जाते. ही सर्व प्रक्रिया राजकीय पक्षच राबवतात, एकेका मतदाराला शोधणे, त्याच्या घरी जाणे, त्याचा पत्ता मिळवणे, हे अत्यंत कठीण काम असते. मुंबई विद्यापीठ यासाठी कुठलेही सहकार्य करत नाही, अशी प्रतिक्रिया मनसेच्या एका नेत्याने दिली. या नेत्याने सांगितले की, दरवर्षी नवीन मतदारांची नोंदणी करून घेतानाच जे जुने मतदार असतात, त्यांच्याकडून देखील दर निवडणुकीला बी फॉर्म भरून घ्यावा लागतो. अशाप्रकारे मनवि सेनेने यावेळी जवळपास 30,000 मतदारांची नोंदणी करून घेतली होती. त्यामुळे मनवि सेनेला या निवडणुकीकडून फार अपेक्षा होत्या.

आदित्य ठाकरे म्हणाले की, सिनेट तुमचे सरकार पाडणार नाहीये, तर हे सरकार आम्ही पडणार आहोत, सगळीकडे तुमचा पराभव झाला आहे आणि याच भीतीने तुम्ही ज्याप्रमाणे मुंबई महापालिकेची निवडणूक लांबवली, त्याप्रमाणे सिनेटची देखील लांबवली, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

दरम्यान, बोगस मतदारांची चौकशी करावी अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केली आहे

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

1 Comment

  1. Nicola Zybia

    August 18, 2023

    Hello there! Would you mind if I share your blog with my twitter group? There’s a lot of people that I think would really enjoy your content. Please let me know. Cheers

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
मुंबई

शिंदेंना हटवण्यासाठी ननावरे आत्महत्येचे विरोधकांच्या हाती कोलीत? मंत्री शंभुराज देसाईसह आमदार डॉ बालाजी किणीकर गोत्यात?

Twitter : @vivekbhavsar मुंबई अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य आठ बाहुबली नेत्यांनी शिंदे – फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळात प्रवेश केल्यापासून, एकनाथ