महाराष्ट्र ताज्या बातम्या

देशभरात २ लाख नव्या पॅक्स; सहकारातून ग्रामीण परिवर्तनाला चालना

मुंबई : “सहकार ही भारताच्या जीवनशैलीचा आत्मा आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज मुंबईत केले. हॉटेल फेअरमोंट येथे आयोजित ‘सहकार से समृद्धि’ राष्ट्रीय परिसंवादात ते बोलत होते.

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, तसेच केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि पंकज भोईर यांच्यासह नाफेडचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा म्हणाले, “युनोने २०२५ हे ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करून ऐतिहासिक पाऊल उचलले. आता देशात २ लाख नवीन प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे.”

शहा यांनी सांगितले की, देशभरातील प्रत्येक गावातील सहकारी संस्थांची माहिती डिजिटल डाटाबेसद्वारे संकलित करण्यात आली असून, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक यांनी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

पॅक्स संस्था आता केवळ कृषीपुरती मर्यादित न राहता २२ नव्या सेवा क्षेत्रांमध्ये कार्यरत होणार आहेत. यामध्ये जनऔषधी केंद्रे, गॅस वितरण, पेट्रोल पंप, रेल्वे तिकीट सेवा, टॅक्सी सेवा यांचा समावेश आहे.
“नॅशनल टॅक्सी” या उपक्रमात टॅक्सी चालकच वाहनाचे मालक असतील आणि त्यांचा नफा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल.

“महिला आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणारे हे उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देतील. सहकाराच्या नव्या पर्वाकडे देश वाटचाल करत आहे,” असेही अमित शहा म्हणाले.

सहकारातून समृद्धीकडे वाटचाल : मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पॅक्स आणि एफपीओ (शेतकरी उत्पादक संस्था) यांच्या माध्यमातून महाराष्ट्राने ग्रामीण भागात विविध योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत.

“या योजनांमुळे रोजगारनिर्मितीला चालना मिळाली असून शेतकऱ्यांना बाजारपेठ साखळी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्राने केंद्र सरकारचे उद्दिष्ट अधिक कार्यक्षमतेने पूर्ण केले आहे,” असे फडणवीस म्हणाले.

त्यांनी नमूद केले की, “महाराष्ट्राला १२० वर्षांची सहकार परंपरा लाभली आहे. ही ऐतिहासिक भूमी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे करण्यासाठी योग्यच आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने सहकार क्षेत्राला नवसंजीवनी मिळाली असून, अमित शहा यांच्या नेतृत्वात नवकल्पनांचा जागर सुरू झाला आहे.”

फडणवीस यांनी नाफेडच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की, धान्य व सोयाबीन खरेदीमध्ये नाफेडने चांगली कामगिरी केली आहे. मात्र, पोत्यांच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना अडचणी येतात, याकडे लक्ष वेधून त्यांनी योग्य नियोजन करण्याचे निर्देश नाफेडला दिले.

प्रदर्शन, सन्मान व पुरस्कार वितरण

परिषदेदरम्यान ‘नाफेडचे सहकारातील योगदान आणि सहकार चळवळीचे महत्त्व’ या विषयावर आधारित लघुपट सादर करण्यात आला.

या वेळी पाच पॅक्स संस्थांना ‘नाफेड बाजार’ फ्रँचायझी सुरू करण्यासाठी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पाच एफपीओंना इक्विटी अनुदानाचे धनादेश देण्यात आले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात