मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात गुरुवारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी चार जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या यशस्वी कारवाईनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महासंचालक (डीआयजी) संदीप पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांचे अभिनंदन केले.
शिंदे यांनी सांगितले की, “देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या लढ्याला महाराष्ट्रात झालेल्या या कारवाईमुळे मोठे बळ मिळाले आहे.”
दोन महिन्यांपूर्वी गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील कवंडे गावात पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आले होते. या भागात नक्षलवादी हालचाली सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुरुवारी दुपारी सी-60 पथकाचे सुमारे 300 जवान आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक तुकडी या भागात पाठविण्यात आली.
शुक्रवारी सकाळपासून नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही तत्काळ प्रत्युत्तर दिले. जवळपास दोन तास सुरू असलेल्या या चकमकीनंतर चार नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. मृतांमध्ये दोन महिला आणि दोन पुरुष नक्षलवाद्यांचा समावेश आहे. यापैकी कुणाची ओळख अद्याप पटलेली नसून, लवकरच त्याबाबत माहिती स्पष्ट केली जाईल, असे डीआयजी संदीप पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांना सांगितले.
या धडक कारवाईबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी डीआयजी पाटील यांच्यासह गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल आणि सी-60 कमांडो पथकातील सर्व जवानांचे अभिनंदन केले. “मुसळधार पावसातही प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत केलेली ही कारवाई अत्यंत प्रशंसनीय आहे,” असे शिंदे म्हणाले.
“या कारवाईमुळे नक्षलवाद्यांना जशास तसे उत्तर मिळाले असून, नक्षलविरोधी लढ्याला नवसंजीवनी मिळाली आहे,” असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.