महाराष्ट्र

मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी राज्यव्यापी सह्यांची मोहिम……!

महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर कोणाचाही विश्वास बसत नसून या निकालात काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत असल्याने जनतेच्या भावनांचा आदर करत मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर सह्यांची मोहिम सुरु करणार आहे. आणि यावेळी जमलेल्या सह्यांचे अर्ज राष्ट्रपती,पंतप्रधान,सरन्यायाधीश व निवडणूक आयोग यांच्याकडे हे अर्ज पाठवण्यात येतील,अशी घोषणा काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी येथे केली.

टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक पार पडली.या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष व CWC सदस्य नसीम खान,मुजफ्फर हुसेन,कुणाल पाटील, डॉ.नितीन राऊत, अमित देशमुख,अस्लम शेख,अमिन पटेल, नांदेडचे नवनिर्वाचीत खा.रविंद्र चव्हाण, खा.कुमार केतकर,यांच्यासह आमदार उपस्थित होते.

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना पटोले म्हणाले की, मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी जनआंदोलन उभे करण्याची घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी संविधानदिनी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात केल्याने महाराष्ट्रात लवकरच या मागणीसाठी सह्यांची मोहीम सुरु केली जाईल आणि जनतेच्या सह्यांचे लाखो अर्ज राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, व निवडणूक आयोगाला पाठवले जाणार आहेत. भारत जोडो यात्रेच्याच धर्तीवर पुन्हा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी यात्रा काढली जाणार आहे,आणि या यात्रेलाही महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करत लोकशाही वाचवणे ही सर्वांचीच जबाबदारी असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.

भाजप महायुतीला पाशवी बहुमत मिळाले असूनही चार दिवस झाले तरी मुख्यमंत्री निश्चित होत नाही आणि सरकारही स्थापन होत नाही. राज्यात शेतकऱ्यांचा समस्या आहेत, बेरोजगारी, महागाई, कायदा व सुव्यवस्था असे प्रश्न असतानाही भाजपा युतीला जनतेची चिंता नाही. कारण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण याचा निर्णय जोपर्यंत ‘मित्र’ घेत नाही तोपर्यंत सरकार व मुख्यमंत्री होणार नाही.आता अडीच वर्षात निम्मी मुंबई व महाराष्ट्र मित्राला विकला आहे, यापुढेही महाराष्ट्र विकण्याचे काम हे सरकार करेल, त्यामुळे ‘मित्राचा’ आदेश येताच मुख्यमंत्री व सरकार बनेल, या आपल्या आरोपाचा पुनरुच्चारही पटोले यांनी केला.

त्याचवेळी आज झालेल्या बैठकीत
पक्षाचा विधिमंडळ पक्षनेता, गटनेता व प्रतोद ठरवण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना देण्याचा ठराव एकमताने घेण्यात आल्याची माहितीही पटोले यांनी दिली.

विवेक भावसार

विवेक भावसार

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. Vivek Bhavsar is an investigative journalist with over three decades of experience covering Maharashtra politics, governance, and public policy. He is the Founder and Editor of TheNews21 and The Rajkaran (राजकारण)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात