मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्प हा स्थानिक रोजगारनिर्मिती वाढवण्यासाठी आणि मत्स्यउत्पादनाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मासेमारीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित होतील. हा प्रकल्प रत्नागिरीच्या विकासात ‘मैलाचा दगड’ ठरेल, असे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. तसेच, या प्रकल्पाची कामे निर्धारित कालावधीत गतीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश त्यांनी सोमवारी मंत्रालयात घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.
बैठकीला मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, सहआयुक्त महेश देवरे, मिरकरवाडा प्रकल्पाच्या मत्स्य विकास अधिकारी अक्षया मयेकर, मत्स्यव्यवसाय विभागाचे कोकण प्रादेशिक उपायुक्त नागनाथ भादुले आदी अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे निर्देश
मंत्री राणे यांनी प्रकल्पाच्या टप्पा क्रमांक दोनमधील कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “प्रकल्पाअंतर्गत संरक्षक भिंतीचे काम त्वरित हाती घेण्यात यावे. निविदा स्तरावरील कामे लवकर सुरू करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. पावसाळ्यापूर्वी प्रकल्पाची कामे पूर्ण झाली पाहिजेत, कारण पावसाळ्यात कामे करणे शक्य होणार नाही. त्यामुळे सुक्ष्म नियोजन करून कामांना वेग द्यावा. कुठल्याही परिस्थितीत विलंब होता कामा नये.”
त्यांनी प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्यांची कार्यवाही पुढील १५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आणि सातत्याने पाठपुरावा करण्यास सांगितले.
प्रकल्पातील महत्त्वाची कामे
मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाच्या टप्पा दोनमध्ये पुढील कामे प्रस्तावित आहेत:
• पश्चिमेकडील लाटरोधक भिंतीची लांबी वाढवणे
• उत्तरेकडे लाटरोधक भिंत बांधणे
• नौकानयन मार्गातील गाळ काढणे
• भराव व सपाटीकरण
• लिलावगृह उभारणे
• जाळी विणण्यासाठी दोन शेड
• सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
• मच्छीमारांसाठी दोन निवारा शेड बांधणे
• पूर्वेकडील ब्रेकवॉटर निष्कासित करणे
• अस्तित्वातील धक्का व जेट्टी दुरुस्ती
या टप्पा दोन अंतर्गत एकूण २२ कामांपैकी ३ कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मंत्री राणे यांना बैठकीत दिली.