By Yogesh Trivedi
मुंबई : पूर्वी चाळ संस्कृती होती. वातावरण खेळीमेळीचे होते. सुख-दुःखात साऱ्यांनी एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची प्रथा होती. ही चाळ संस्कृती उत्तम होती, मात्र आता ब्लॉक्स संस्कृती बोकाळली आहे आणि त्यात सगळेच ब्लॉक झाले आहेत. कुणाला कुणाचा मेळ नाही, सुख-दुःखाची पर्वा नाही. आई-वडील वृद्धाश्रमात आणि मुले विदेशात—इतकेच नव्हे, तर अंत्यसंस्कारासाठीही त्यांना वेळ नसतो. म्हणून सांगतो, एकमेकांना साद घालत जा, शेजारी-पाजारी यांच्याशी सौहार्दाचे संबंध ठेवा, तेच उपयोगी पडतील, अशा शब्दांत एअर इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. पुष्पकांत ऊर्फ तात्यासाहेब पिंपळे यांनी विदारक वास्तव मांडले.
बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विशेष सोहळ्यात तात्यासाहेब पिंपळे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केलेल्या हेमचंद्र मानकामे, विलास सुर्वे, सुनेत्रा एडवणकर, सुभाष लाड, भीमरथी वेर्लेकर आणि मनीषा पाटील या सदस्यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त त्यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. तसेच नव्वदी ओलांडलेल्या सरलाताई भोसेकर यांनाही विशेष सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात सुरेंद्र कामत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर मोहन शेजवलकर, रवींद्र रानडे, शमा शेडगे आणि उषा कुलकर्णी यांनी सन्मानित सदस्यांचा परिचय करून दिला. बा. द. जोशी यांनी अभीष्टचिंतन श्लोक सादर करत शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संजय देशपांडे यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यवाह स्मिता चितळे यांनी प्रास्ताविक केले, तर अध्यक्षा रुचिरा दिघे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन मोहन शेजवलकर यांनी केले आणि गजानन बर्वे यांनी आभार प्रदर्शन केले.
वर्धापन दिनानिमित्त रामदास कामत यांचा ‘व्यथा संसाराची’ हा खुमासदार कार्यक्रम सादर करण्यात आला. या वेळी दहिसर येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिराचे विश्वस्त मधुसूदन पै, एअर इंडियाच्या सेवानिवृत्त अधिकारी सौ. मीना नाईक इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.