मुंबई : “महाराष्ट्र आणि तंजावरच्या रहिवाशांमध्ये भेटीगाठी घडून मनोमिलन व्हावे, आणि त्यातून तंजावरमध्ये राहणाऱ्या सुमारे तीन लाख मराठी भाषिकांना त्यांच्या मूळ गावांची, कुळांची ओळख पटावी,” अशी भावना तंजावरचे सध्याचे महाराज बाबाजीराजे भोसले यांनी आज येथे व्यक्त केली.
महाराज भोसले यांनी मंत्रालय व विधिमंडळातील वार्ताहर कक्षाला भेट दिली. यावेळी अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीत उपमुख्यमंत्री मंगेश चिवटे यांचे स्वीय सहायक आणि शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे हेही उपस्थित होते.
बाबाजी महाराज म्हणाले की, “तंजावरमध्ये आजही तीन लाखांहून अधिक मराठी लोक राहतात. काळाच्या ओघात थोडा बदल झाला असला तरी आजही घराघरात मराठी बोलली जाते. उत्सव साजरे करण्याची पद्धत, लोककला, गोंधळ, भारूड, लावणी, फुगडी या गोष्टी आजही तितक्याच उत्साहाने पाळल्या जातात. गोंधळी वस्ती आजही तिथे आहे. समर्थ रामदास स्वामींचा मठ आहे. शिवकालीन कविंद्र परमानंदांनी लिहिलेल्या शिवभारत ग्रंथाची मूळ प्रत तिथे आहे. तंजावरमध्ये महाराष्ट्रातील अनेक आडनावे आढळतात, पण दुर्दैवाने अनेकांना त्यांच्या मूळ गावांची माहिती नाही.”
“महाराष्ट्र-तंजावर यांचे भावनिक, सांस्कृतिक, कौटुंबिक रोटी-बेटी संबंध जपले गेले पाहिजेत. यामुळे संस्कृतीचे जतन होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि नंतर केंद्रीय मंत्री असताना तामिळनाडू सरकारला तंजावरकर मराठी लोकांची काळजी घ्या, असे सांगितल्याची आठवणही त्यांनी दिली,” असे ते म्हणाले.
“तंजावरमध्ये शेकडो वर्षांपूर्वीची मोडी लिपीतली कागदपत्रे आहेत. त्यांचा अभ्यास करण्यासाठी मोडी जाणणाऱ्या अभ्यासकांची गरज आहे. भविष्यात तंजावरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा नक्की विचार करणार आहोत,” असे आश्वासनही महाराज भोसले यांनी दिले.