शिवराज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय
महाड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर ६ जून (तारखेप्रमाणे) आणि ९ जून (तिथीनुसार) होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. २८ आणि २९ मे रोजी रायगड किल्ल्यावर जाणारा पारंपरिक पायरीमार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी २२ मे रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश प्रसिद्ध केला आहे.
सन २०२३ मध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान महादरवाज्याजवळील उंच कड्यावरून दरड कोसळून एका शिवभक्ताचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर अन्य लहान-मोठ्या दुर्घटनाही घडल्या होत्या. याचा अनुभव लक्षात घेऊन, यंदा संभाव्य धोके टाळण्यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून पायरी मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या मोहिमेसाठी दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या अनुभवी गिर्यारोहकांची नियुक्ती करण्यात आली असून, २८ व २९ मे रोजी या पथकाद्वारे पायरी मार्गावरील सैल दगड, धोंडे बाजूला करण्याचे काम केले जाणार आहे. मोहिमेदरम्यान कोणताही अपघात टाळण्यासाठी पायरी मार्ग पूर्णतः बंद राहणार आहे. मात्र, पर्यटक आणि शिवभक्तांच्या सोयीसाठी रोपवे सेवा मात्र नियमितपणे सुरू राहणार असल्याचे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, चित्त दरवाजा, नाणे दरवाजा, होळीचामाळ, शिरकाई देवी मंदिर परिसर आदी ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.