मे महिन्यात दरवर्षी कडक उन्हाळा जाणवतो, परंतु यंदा मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात धुवाधार पाऊस पडत आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर अंतर्गत ९ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील ८, जालना व लातूर जिल्ह्यात प्रत्येकी ५ मंडळात अतिवृष्टीचा कहर झाला आहे. एकूण २७ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद असून, नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
गेल्या आठवड्यापासून मराठवाड्यातील वातावरण सतत बदलत आहे. वादळी वारे, ढगांचा गडगडाट, अवकाळी पावसामुळे संध्याकाळी पावसाची हजेरी नित्याची झाली आहे. हवामान विभागानुसार, हा पाऊस आणखी काही दिवस कायम राहणार आहे. दररोजच्या पावसामुळे विजेचा कडकडाट, घरांचे नुकसान, शेतीचे नुकसान, तसेच जनावरांचे मृत्यू अशा घटना सतत घडत आहेत. विशेषतः भाजीपाला उत्पादक व फळबाग धारक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आले आहेत.
अनेक ठिकाणी वीज पडून जनावरे दगावली आहेत. लातूर जिल्ह्यातील नेलवाड शिवारात एक म्हैस आणि एरंडी येथे एक गाय दगावली. बीड जिल्ह्यात वीज पडून ५२ जनावरे मृत्युमुखी पडली, तर तीन जण जखमी झाले. माजलगाव तालुक्यातील शुक्लेश्वर तीर्थ लिंबगाव येथील अशोक शेरकर यांचा वीज पडून मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात २९६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, ५ मृत्यू, ३६ जनावरे मृत, ३० गावे बाधित आणि ६८० शेतकऱ्यांचे नुकसान शासकीय नोंदवले गेले आहे.
अवकाळी पावसामुळे विद्युत वाहिन्या कोसळल्या, रोहित्रांची हानी झाली, गोठ्यांची मोडतोड झाली, अनेक घरांची पडझड झाली. उमरगा तालुक्यातील बेणीतुरा नदी दुथडी भरून वाहते आहे. अनेक सखल भागात पाणी साचल्याने शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.
राज्यात जानेवारी ते एप्रिल २०२५ या चार महिन्यांत विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ५४,५३३ हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले. याच काळात जवळपास १,००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. शेतकऱ्यांना अद्याप १३,८१९ कोटी रुपये नुकसानभरपाई वाटप बाकी आहे. मात्र, सरकार पीक कापणी प्रयोगावर आधारित निकषांनुसार एकदाच भरपाई देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.
दरम्यान, राज्य सरकारने खरीप हंगामासाठी २०४ लाख टन उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे. हवामान विभागानुसार राज्यात सरासरीपेक्षा ७ ते १७ टक्के अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात पावसाच्या खंडांचा प्रभावही कमी असेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी सत्यप्रत बियाणे केंद्र आता केंद्रसरकारच्या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. यामुळे बोगस बियाण्यांचा प्रसार रोखता येईल. याशिवाय, कृषी विभागाने विकसित केलेल्या ‘महाविस्तार AI अॅप’चा लोकार्पणही नुकताच झाला आहे. या अॅपवर लागवड, कीड व्यवस्थापन, शेतीची संपूर्ण माहिती व्हिडीओसह उपलब्ध असणार आहे.
एकीकडे राज्यशासन विविध उपाययोजना करत असतानाच, दुसरीकडे निसर्ग मात्र शेतकऱ्यांवर अवकृपा करत आहे. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात पोहोचली असून, त्यांना तात्काळ मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे.