मुंबई : ‘‘21व्या शतकात उद्योग आणि व्यवसाय संसाधनांपेक्षा नवकल्पना व सक्षम मनुष्यबळाच्या आधारावर विकसित होतील. म्हणूनच ‘लर्न, अनलर्न आणि रिलर्न’ हाच नव्या शिक्षणक्रांतीचा मंत्र आहे,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुंबईत एमपीएसटीएमई आणि एनएमआयएमएसच्या नव्या इमारतींचे उद्घाटन तसेच एसव्हीकेएम शैक्षणिक संकुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार अमित साटम, आमदार पराग अळवणी, कुलगुरू डॉ. अमरीश पटेल, एसव्हीकेएमचे अध्यक्ष भूपेश पटेल आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी एनएमआयएमएस विद्यापीठाचे कौतुक करताना म्हटले की, ‘‘डॉ. अमरीश पटेल यांनी ही संस्था घडवताना मूल्यांशी तडजोड केली नाही, त्यामुळेच आज ती देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे.’’
विद्यार्थ्यांना भारतातच मिळणार जागतिक शिक्षण
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे भारतातील दरवाजे आता जागतिक विद्यापीठांसाठी खुले झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना नवी मुंबईतील ‘एज्युसिटी’मध्ये आपले कॅम्पसेस उभारण्यासाठी ‘लेटर ऑफ इंटेंट’ (LOI) देण्यात आले. लवकरच आणखी पाच परदेशी विद्यापीठे येथे येणार असून यामुळे भारतात राहूनच कमी खर्चात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.
आता स्पर्धा देशांतर्गत नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर
“स्पर्धा हीच प्रगतीची गती आहे. आपण आता फक्त देशांतर्गत नव्हे, तर आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी स्पर्धा करणार आहोत. पुढील दोन-तीन वर्षांत या संस्थांची तुलनाही होईल. ही चांगली स्पर्धा आपल्याला अधिक सक्षम करेल,” असे फडणवीस म्हणाले.
एआयच्या युगात शिक्षण ‘डायनॅमिक’ झाले
पूर्वी शिक्षणव्यवस्था बदल स्वीकारण्यात फार धीम्या गतीने वाटचाल करत होती. अभ्यासक्रम बदलायच्या आत जग पुढे जात असे. परंतु नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण आता स्थिर न राहता ‘डायनॅमिक’ झाले आहे. मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम शक्य होतो आहे. उद्योगांच्या गरजेनुसार तंत्रज्ञान-केंद्रित कार्यबल निर्माण होत आहे.
स्टार्टअप इकोसिस्टममध्ये महाराष्ट्र आघाडीवर
“महाराष्ट्र आणि मुंबई हे आज देशाचे स्टार्टअप कॅपिटल आहे. ‘स्टार्टअप इंडिया’च्या अहवालानुसार महाराष्ट्र गुंतवणूक आणि स्टार्टअप्सच्या संख्येत देशात क्रमांक एकवर आहे. राज्य सरकारने स्टार्टअपसाठी ‘फंड ऑफ फंड्स’ निर्माण केला असून त्याद्वारे शेकडो स्टार्टअप्स उदयास आले आहेत,” अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
रोजगार मागणारे नव्हे, रोजगार निर्माण करणारे विद्यार्थी घडवणार
“शासनासह शैक्षणिक संस्थांची जबाबदारी आहे की, तरुणांच्या कल्पकतेला पोषक वातावरण निर्माण करावे. आपण रोजगार मागणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक घडवू, हेच आपले अंतिम ध्येय असावे,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.