मुंबई: इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथे मुसळधार पावसामुळे पादचारी पूल वाहून जाण्याची दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसोबत आणि जखमींच्या पाठीशी महायुती सरकार खंबीरपणे उभे असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आणि माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले.
मात्र या गंभीर घटनेचा राजकीय वापर करत खासदार संजय राऊत यांनी केलेली टीका उथळ आणि अपरिपक्व असल्याची टीका त्यांनी केली. आज मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी राऊत यांच्यावर घणाघात केला.
चव्हाण म्हणाले, “या पूलाच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेत हेतुपुरस्सर दिरंगाई झाली असेल, तर दोषी अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल. प्रशासनाने कोणतीही दुर्लक्ष केले असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही.”
या पत्रकार परिषदेला भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित होते.
⸻
८ कोटींच्या निधीसाठी जुलै २०२४ मध्ये मंजुरी – काम सुरू करण्याचे आदेशही दिले
चव्हाण यांनी माहिती दिली की, कुंडमळा नदीवरील जोडरस्त्यासह नवीन पूल उभारण्यासाठी जुलै २०२४ च्या पुरवणी अर्थसंकल्पात ८ कोटींच्या निधीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने कामात अडथळा निर्माण झाला.
त्यानंतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून पूलाच्या डिझाईनला अंतिम स्वरूप देण्यात आले. मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांच्या पाठपुराव्यानंतर, ११ जुलै २०२४ रोजी नवीन पूलासाठी ८ कोटींच्या निधीस तातडीने मान्यता देण्यात आली. बांधकाम विभागाने एका वर्षात काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
“तरीदेखील जर पुढील प्रक्रियेला हेतुपुरस्सर विलंब झाला असेल, तर त्याची चौकशी होईल आणि दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट वक्तव्य चव्हाण यांनी केले.
⸻
‘अर्थसंकल्प कसा वाचावा’ – राऊत यांना पुस्तक भेट देणार!
“राज्यसभेचे खासदार असूनही संजय राऊत यांना अर्थसंकल्प वाचण्याची साधी समज नसावी, असे त्यांच्या आरोपांवरून दिसते,” अशी टोलेबाजी चव्हाण यांनी केली.
“अर्थसंकल्पातील आकडे हजारांमध्ये असतात. त्या प्रमाणात पूल दुरुस्तीसाठी ८ कोटींची तरतूद केली होती. जर हे राऊत यांना समजत नसेल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘अर्थसंकल्प – सोप्या भाषेत’ हे पुस्तक आम्ही त्यांना भेट देऊ,” अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.