मुंबई: “राज्यात २०२२ मध्ये जनतेच्या मनातील सरकार आणलं. त्यानंतर काही लोकांनी केवळ आरोप आणि टीकाच केली, पण आम्ही कामातून उत्तर दिलं. त्यामुळेच जनता आज काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभी आहे, घरात बसणाऱ्यांच्या नाही,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
उपमुख्यमंत्री शिंदे मंगळवारी नाशिकमध्ये आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलत होते. ठाकरे गटाच्या चार नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते शिंदे यांच्या उपस्थितीत शासकीय मुक्तागिरी निवासस्थानी शिंदे गटात सहभागी झाले.
या कार्यक्रमाला मंत्री दादा भुसे, खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना सचिव राम रेपाळे, नाशिक जिल्हाप्रमुख व उपनेते अजय बोरस्ते हेही उपस्थित होते.
पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये:
• युवती सेना उपजिल्हा प्रमुख व नगरसेविका किरण बाळा दराडे
• महिला बालकल्याण सभापती सीमा गोकुळ नगळ
• माजी सभापती पुंडलिक अरिंगळे
• माजी नगरसेवक पुनजाराम गामणे
आणि इतर अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता.
“तुम्ही स्वगृही परतला आहात” – शिंदेंचे स्वागतपर शब्द
“बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. तुमचं पूर्वीचं चिन्ह धनुष्यबाण होतं आणि आजही तेच आपलं चिन्ह आहे. तुम्ही स्वगृही परतलात,” असे म्हणत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नवीन नगरसेवकांचे पक्षात स्वागत केले.
त्यांनी सांगितले की, नाशिककरांचे शिवसेनेशी जिव्हाळ्याचे नाते आहे. आजच्या पक्षप्रवेशामुळे नाशिकमधील शिवसेना अधिक मजबूत होईल आणि येथील विकासाला गती मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
“शिवसेना ही विकासाचीच वाट चालते”
“मुख्यमंत्रीपदाच्या अडीच वर्षांत जनहिताच्या योजना राबवल्या. त्यामुळेच राज्यातील जनतेने आम्हाला विश्वास दिला आणि ८० जागांपैकी ६० जागांवर विजय मिळवून दिला,” अशी आठवण शिंदेंनी करून दिली.
“महायुतीने २३२ जागांवर ऐतिहासिक यश मिळवलं. शिवसेना ही दिलेला शब्द पाळणारी आणि लोकांच्या अडचणींवर तात्काळ उपाय करणारी पक्षसंस्था आहे,” असे ते म्हणाले.
शेवटी, “आज पक्षात दाखल झालेले नगरसेवक हे तळागाळात काम करणारे लोक आहेत. त्यामुळे रोज विविध पक्षांचे कार्यकर्ते शिवसेनेत सामील होत आहेत,” असे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित केला.