मुंबई : जोगेश्वरीतील दोन झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांमध्ये चांदिवाला एंटरप्रायझेस या विकासकाकडून सुमारे ₹६६० कोटींचा आर्थिक घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना उपनेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी केला आहे. यामध्ये २२० अनधिकृत फ्लॅट्स उभारण्यात आले असून, हे फ्लॅट्स मुस्लिम समुदायातील नागरिकांना विकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना निरुपम म्हणाले की, या विकासकाकडून ‘हाउसिंग जिहाद’च्या माध्यमातून मुंबईचा सामाजिक समतोल बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. “या प्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मी थेट तक्रार केली असून, त्यांच्या आदेशानुसार चौकशी सुरु आहे. प्राथमिक अहवालात ‘हाउसिंग जिहाद’चे पुरावे समोर आले असून, लवकरच अंतिम चौकशी अहवाल प्रसिद्ध होईल,” असे निरुपम यांनी स्पष्ट केले.
या घोटाळ्यात खोट्या दस्तऐवजांच्या आधारे एफएसआय मिळवून शासनाची फसवणूक करण्यात आली असून, एकूण ₹६६० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणात आणखी कोणकोण सहभागी आहेत, याचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
निरुपम पुढे म्हणाले, “चांदिवालासारखेच मुंबईमध्ये आणखी २० ते २५ बिल्डर्स आहेत, जे मराठी नागरिकांची घरे अधिग्रहित करून ती पुनर्विकासाच्या नावाखाली मुस्लिमांना विकतात. हे एक नियोजित षड्यंत्र असून, सरकारने अशा सर्व प्रकल्पांची तपासणी करून योग्य ती कारवाई केली पाहिजे.”
“या व्यवहारात ज्या मराठी कुटुंबांचे नुकसान झाले आहे, त्यांच्या मालकीच्या घरांची परतफेड होणे आवश्यक आहे. राज्य सरकारने अशा नागरिकांना न्याय द्यावा,” असेही संजय निरुपम यांनी ठामपणे सांगितले.