ताज्या बातम्या महाराष्ट्र

प्रयोगात्मक कलांसाठी शाहीर साबळे संशोधन केंद्राची स्थापना – ॲड. आशिष शेलार यांची घोष

मुंबई : महाराष्ट्रातील समृद्ध प्रयोगात्मक कलांचा सखोल अभ्यास आणि संशोधन करता यावे, यासाठी पु.ल. देशपांडे कला अकादमीत स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या केंद्राला पद्मश्री शाहीर कृष्णराव साबळे यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज मंत्रालयात घेतलेल्या बैठकीत केली.

या बैठकीस सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे, लोककला अभ्यासक प्रा. प्रकाश खांडगे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री शेलार म्हणाले, “महाराष्ट्राला शाहीर, पोवाडा, जागरण, गोंधळ, तमाशा, वाघनाट्य, दशावतार, भारुड, कीर्तन, लोकनाट्य अशा विविध प्रयोगात्मक कलांची वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. या कलांमध्ये महाराष्ट्राच्या सामाजिक व सांस्कृतिक जडणघडणीचे ऐतिहासिक संदर्भ दडलेले आहेत. त्यांच्या अभ्यासासाठी संशोधनाची गरज असून, हे संशोधन जगासमोर मांडले गेले पाहिजे.”

राज्यातील आणि राज्याबाहेरील पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. अभ्यासकांसाठी हे संशोधन केंद्र उपयुक्त ठरणार असून, त्या दृष्टीने या केंद्राचा प्रारूप आराखडा लवकरच तयार करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंत्री शेलार यांनी पुढे सांगितले, “या संशोधन केंद्राला योग्य नाव देताना, कलाक्षेत्रातील जाणकारांनी सुचविल्यानुसार संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रणी असलेल्या आणि लोककलांच्या जतन, प्रचार व प्रसारासाठी आयुष्य वाहिलेल्या शाहीर साबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.”

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात