चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात
मुंबई – “सेना गमावली, मग शिव हरवले, आणि आता हिंदुत्वही सोडलं,” अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गुरुवारी झालेल्या वर्धापन दिन सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यावर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेला प्रत्युत्तर देताना बावनकुळे यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
“उद्धव ठाकरे यांच्या भाषणात पराभवाच्या भीतीतून आलेली हतबलता स्पष्ट होती. जिथे जनाधार संपतो तिथे आरोळ्या वाढतात, आणि उद्धव ठाकरे सध्या याच अवस्थेत आहेत,” असा टोला बावनकुळे यांनी लगावला. पुढे ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण देशभर दौरे करत असताना उद्धव ठाकरे मात्र मातोश्रीत बसून ऑनलाईन भाषणं देत होते – हे महाराष्ट्र विसरलेला नाही.”
“निवडणुका जवळ आल्या, की उद्धव ठाकरेंना मुंबई, मराठी माणूस आणि सामान्यांचे प्रश्न आठवतात. पण सलग २५ वर्षे मुंबई महापालिकेवर सत्ता असूनही झोपडपट्टी विकास, पाणी, शिक्षण, आरोग्य अशा मूलभूत बाबींमध्ये काय ठोस बदल घडवला?” असा सवाल करत बावनकुळे म्हणाले की, “आज जे कोस्टल रोड, मेट्रो, क्लस्टर डेव्हलपमेंट, झोपडपट्टी पुनर्वसनसारखे मोठे प्रकल्प सुरू आहेत, त्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि दूरदृष्टी आहे, हे मुंबईकर विसरणार नाहीत.”
उद्धव ठाकरे यांची टीकाटिप्पणी बाजूला सारत, बावनकुळे यांनी पुढे स्पष्ट केलं, “तुम्ही गरळ ओकत राहा, टिंगलटवाळी करत राहा, पण लोकसेवेची तळमळ तुमच्यात नाही हे जनतेने ओळखलं आहे. आणि याचं उत्तर लोकशाही मार्गाने, निवडणुकांमध्ये मिळणारच आहे.”
शेवटी त्यांनी ठामपणे म्हटलं, “मुंबई आमची आहे असं ओरडून सांगण्यात अर्थ नाही. मुंबईला जर विकास, सुरक्षितता आणि मराठी सन्मान हवा असेल, तर भाजपा-शिंदे गट-राष्ट्रवादी महायुतीचाच झेंडा पुन्हा एकदा फडकणार – हीच मुंबईकरांची भावना आहे.”