मुंबई – “राज्यात केवळ मराठी भाषा बंधनकारक असून हिंदीची सक्ती कुठेही करण्यात आलेली नाही, उलट ती ऐच्छिक तिसऱ्या भाषेचा पर्याय म्हणून उपलब्ध करून देण्यात आली आहे,” अशी परखड स्पष्टोक्ती मुंबई भाजपा अध्यक्ष व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
“फक्त चर्चा घडवण्यासाठी, समाजात संभ्रम पसरवण्यासाठी आणि राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी काही मंडळी हिंदीच्या नावावर चुकीची माहिती पसरवत आहेत. पण आम्ही मराठीप्रेमीही आहोत आणि विद्यार्थ्यांच्या हिताचेही खंदे पुरस्कर्ते आहोत,” असे शेलार यांनी ठणकावून सांगितले.
राज्यात सध्या सुरू असलेल्या हिंदी विरोधातील आंदोलनांवर आणि टीकांवर शेलार यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. “या सर्व चर्चा अतार्किक, अवाजवी आणि पूर्णतः अवास्तव आहेत. त्यामागे कोणतेही शैक्षणिक विवेक नाही,” असा आरोप करत त्यांनी सरकारची भूमिका सविस्तर स्पष्ट केली.
शेलार यांची ठळक मुद्द्यांमधून भूमिका:
• राज्यात हिंदी भाषा सक्तीची नव्हे, ऐच्छिक आहे.
५वी ते ८वी यापूर्वी सक्ती होती, ती भाजपा सरकारने काढून टाकली असून आता हिंदी ही १५ पर्यायी भाषांपैकी एक आहे.
• केंद्राच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात तिसऱ्या भाषेची सक्ती नाही.
ती केवळ ‘पर्यायी’ म्हणून दिली जाते. ती शिकवायची की नाही, हे शाळा आणि पालक ठरवू शकतात.
• तिसरी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक क्रेडिट मिळणार आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तिसरा पर्याय न दिल्यास ते राष्ट्रीय स्तरावर मागे पडतील.
• महाराष्ट्र बोर्डातील विद्यार्थ्यांना इतर बोर्डांतील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करायची आहे.
अशा वेळी केवळ दोन भाषा शिकवणे म्हणजे त्यांच्यावर अन्याय आहे.
शेलार म्हणाले, “मराठीचा आग्रह आमचाही आहे, पण त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या भविष्यात अडथळा ठरणारे निर्णय आम्ही घेत नाही. भाजपचे धोरण भावनात्मक नसून तथ्याधारित आणि विद्यार्थीहितसंपन्न आहे.”
शेलार यांनी यावेळी कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव न घेता टोला लगावत स्पष्ट केलं की, “असत्य प्रचार करून, आंदोलनांचा खेळ करून मराठीचा खोटा ठेका घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण जनता सुजाण आहे. आम्ही तथ्यावर आधारित बोलतो.”
पत्रकार परिषद ही राजकीय टीकेसाठी नव्हे, तर शिक्षणव्यवस्थेतील वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्यासाठी घेतली आहे, असे स्पष्ट करत शेलार यांनी सांगितले की, “राजकीय आरोपांना जशास तसे उत्तर योग्य वेळी दिले जाईल.”
भाजपचा स्पष्ट संदेश – मराठीचा अभिमान, पण शिक्षणात विद्यार्थ्यांचे हित सर्वोपरि!
हिंदीवर सक्ती नाही, पण खोटी चर्चा मात्र थांबवावी लागेल!