By: योगेश त्रिवेदी
मुंबई : जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त आणि सद्गुरु श्री वामनराव पै यांचे सुपुत्र श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी ८ जुलै रोजी वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केली. या औचित्याने, मिशनने १० जुलै रोजी गुरु पौर्णिमेच्या पावन दिवशी ‘प्रल्हाद पै अमृत महोत्सव’ उत्साहात साजरा केला.
मुंबईसह महाराष्ट्र व परदेशातून आलेल्या हजारो नामधारकांच्या उपस्थितीने सोहळा भावपूर्ण झाला. तब्बल २० हजारहून अधिक नामधारकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला, तर लाखो अनुयायांनी ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रमाचे दर्शन घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाने झाली. त्यानंतर गुरुपूजन आणि ‘संगीत जीवनविद्या’च्या माध्यमातून सद्गुरुंच्या चरणी सुरमयी अभिवादन करण्यात आले.
या सोहळ्याचे दोन महत्त्वाचे क्षण विशेष ठरले. पहिले म्हणजे, श्री सद्गुरु वामनराव पै यांचे चरित्र ‘एकमेव – जनमनाचा असामान्य शिल्पकार’ या ग्रंथाच्या मुखपृष्ठाचे अनावरण. सुप्रसिद्ध सुलेखनकार पद्मश्री अच्युत पालव यांनी हे मुखपृष्ठ साकारले आहे. अनावरणानंतर बोलताना पालव म्हणाले, “पेरुचाळ ते राष्ट्रपती भवन हा प्रवास सद्गुरुंच्या शिकवणीमुळेच शक्य झाला. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हा संदेश मी आयुष्यात अनुभवला आहे.”
दुसरा महत्त्वाचा क्षण होता ‘कृतज्ञ तू, कृतार्थ तू’ या प्रल्हाद पै यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन. “कृतज्ञता मनात, भरभराट जीवनात” या त्यांच्या जीवनदृष्टीचे प्रतिबिंब या ग्रंथात उमटले आहे.
या सोहळ्यात वाळू शिल्पाच्या (सँड आर्ट) माध्यमातूनही प्रल्हाद दादांना मानवंदना देण्यात आली. कलाकार नितेश भारती यांनी या कलाकृतीतून दादांचा जीवनप्रवास आणि नामधारकांच्या भावना हुबेहुब टिपल्या.
कार्यक्रमात श्री प्रल्हाद दादांचे औक्षण करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रमुख उपस्थितांमध्ये पद्मश्री अच्युत पालव, डॉ. प्रसाद प्रधान, निलेश जाधव, माजी खासदार संजीव नाईक, गोपाळ शेट्टी, विजय बाविस्कर, भाई गिरकर, वंदना मोहिते (सनदी अधिकारी), अंकित काणे, सुरेश हावरे, अभिनेते शरद पोंक्षे, ऐश्वर्या व अविनाश नारकर, अशोक हांडे आदींचा समावेश होता.