मुंबई : उत्तरकाशी जिल्ह्यात धराली परिसरात ५ ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीजन्य (UttarKashi Flood) पुरामुळे गंगोत्री यात्रेसाठी गेलेले महाराष्ट्रातील अनेक यात्रेकरू (pilgrims from Maharashtra) अडकले होते. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी तत्काळ लक्ष घालून प्रशासनाशी समन्वय साधला. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अडकलेल्या ५१ यात्रेकरूंशी संपर्क साधला गेला असून सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे.
विशेषतः संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) १८ जणांचा संपर्क तुटला होता. या संदर्भात श्रीमती रंजना कुलकर्णी (संपर्कप्रमुख, लातूर जिल्हा) आणि आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) संचालक भालचंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून संबंधित नातेवाईकांना दिलासा देण्यात आला.
अडकलेल्या यात्रेकरूंमध्ये प्रमिला व शिवाजी दहिवाळ, कल्पना बनसोड, उषा नागरे, किरण व शिवदत्त शहाणे, उज्वला व अरुण बोर्डे, नूतन व संतोष कुपटकर, मंजुषा नागरे, शुभांगी शहाणे, श्रीकृष्णा, शीतल, वेदांत आणि नवज्योत थोरहत्ते आदींचा समावेश होता. पुरामुळे रस्ते, घरे, हॉटेल्स आणि लष्करी तळांचेही मोठे नुकसान झाले असून, संपर्क व वाहतूक व्यवस्था खंडित झाली होती.
डॉ. गोऱ्हे यांनी उत्तराखंड (Uttarakhand government) व महाराष्ट्र शासनाच्या तातडीच्या प्रतिसादाबद्दल आभार मानले असून, उर्वरित नागरिकांसाठी देखील तातडीने कारवाई करण्याची विनंती संबंधित राज्यांच्या प्रमुखांकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी यंत्रणांना त्वरीत मदतीचे निर्देश दिले आहेत.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “ही नैसर्गिक आपत्ती असून, अशा वेळेस शासन खंबीरपणे नागरिकांच्या पाठीशी आहे. अडकलेल्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नातेवाईकांनी घाबरू नये.”
राज्य शासनाने वैद्यकीय, अन्न, निवास आणि वाहतूक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. बेपत्ता किंवा रुग्णालयात दाखल असलेल्या यात्रेकरूंच्या माहितीसाठी हेल्पलाईन कार्यरत आहे:
• महाराष्ट्र शासन हेल्पलाईन: 9321587143 / 022-22027990 / 022-22794229
• उत्तराखंड शासन हेल्पलाईन: 0135-2710334 / 8218867005
सरकारच्या सक्रिय हस्तक्षेपामुळे यात्रेकरूंच्या कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली असून, उपसभापतींच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे भीतीच्या काळातही विश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले आहे.