महाराष्ट्र ताज्या बातम्या

नंदुरबारची आदिम आहारसंस्कृती मुंबईत अवतरली — ‘वनं आहार महोत्सव’ लोकप्रिय

मुंबई – भारताची आदिम संस्कृती ही देशाचे वेगळेपण अधोरेखित करणारी जिवंत परंपरा आहे. मुंबईसारख्या धावत्या महानगरात राहणाऱ्या समाजालाही या संस्कृतीचे अप्रूप आणि अस्सल सौंदर्य जवळून अनुभवण्याची संधी शिवाजी पार्कजवळील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक प्रांगणात भरविण्यात आलेल्या ‘वनं आहार महोत्सवा’तून मिळाली.

येथे महाराष्ट्राच्या उत्तरेकडील टोकाला असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील पावरा आदिवासी समाजाच्या आहारशैलीचे, औषधी परंपरेचे आणि दुर्मिळ रानभाज्यांचे अनोखे प्रदर्शन पाहायला मिळाले. मुंबईतील अभ्यासू आणि संवेदनशील कुटुंबे आपला हा महान सांस्कृतिक ठेवा उत्सुकतेने अनुभवताना दिसले.

या उपक्रमाचे नियोजन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, पोश फाउंडेशन आणि दादर सांस्कृतिक मंच यांनी संयुक्तपणे केले. कार्यक्रमात आदिवासी समाजाचे जीवनविश्व, त्यांच्या उपचारपद्धती, वनौषधींचे महत्त्व आणि शतकानुशतकांचा आहारशास्त्राचा वारसा प्रभावीपणे दाखविण्यात आला आहे.

नंदुरबारातील धडगाव तालुक्यातील अमोघ सटजे—उच्चशिक्षित असूनही मातीतल्या नाळेशी घट्ट जोडलेल्या—या तरुणाने आपल्या शेतातील उत्पादनांवर आधारित दुर्मिळ रानभाज्या, धान्ये आणि औषधी वनस्पतींचे उत्कृष्ट सादरीकरण केले. विशेष म्हणजे, ते स्वतः किचनमध्येही लक्ष देत होते आणि प्रदर्शनाला येणाऱ्यांसाठी अस्सल आदिवासी आहार स्वतः बनवून देत होते. त्यांच्या कष्टामुळे मुंबईत क्वचितच मिळणारे आणि बहुतेकांना अज्ञात असलेले पदार्थ येथे स्वादिष्ट रूपात पाहायला आणि चाखायला मिळाले.

प्रदर्शनात हेवा (सुकी भाजी), शेवटा (ओली भाजी), कुतवला, वाज, काकडो, खांबण्या, आला, वाथाडो, शल्लकी, हाफ दुडको, बुंदारा, महुआ अशा अनेक रानभाज्यांसह विविध व्याधींवर परिणामकारक वनौषधी मांडण्यात आल्या होत्या.

प्रदर्शनाचा फेरफटका मारल्यानंतर पर्यटकांना ब्रेड जाम (रानफुलांचा), डोमखा चहा (रानफुलांचा चहा), कांद आबण्या (उकडलेला कंद), डुडान गाठ डाल (मक्याचा भात आणि मक्याचे वरण), हिता आथाणो (गव्हाचा डोसा आणि चटणी) यासारख्या दुर्मिळ आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता आला—जणू काही नंदनवनातील अनोखे सुख.

मुंबईकरांना आदिम जीवनशैली आणि निसर्गाशी एकरूप असलेल्या आहारसंस्कृतीचे दर्शन घडविणारा हा महोत्सव खरोखरच उल्लेखनीय ठरला.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात