मुंबई : — “भारत–रशिया मैत्रीची भक्कम पायाभरणी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झाली आहे. १९७१ च्या युद्धात अमेरिकेने पाकिस्तानला पाठिंबा दिला असताना, भारताच्या सामर्थ्यवान परराष्ट्र धोरणाची दखल घेऊन रशियाने उघडपणे साथ दिली. ही मैत्री काँग्रेस काळातच घडली असून, आजही तिचा फायदा भारताला होत आहे,” अशी टिप्पणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी एका निवेदनात केली.
तिवारी म्हणाले की, “पं. नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रनिर्मिती, स्वयंसिद्धता आणि मुत्सद्देगिरीमुळेच भारत–सोव्हिएत ‘शांतता, मैत्री आणि सहकार्याचा करार’ ऑगस्ट १९७१ मध्ये शक्य झाला. चीनच्या धमक्यांनाही न घाबरता रशियाने भारताची साथ दिली. या ऐतिहासिक संबंधांचा पाया काँग्रेसने घातला, याचा आम्हाला अभिमान आहे.”
तिवारी यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीच्या स्वागत समारंभात काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण न देण्यावरही तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षनेताच राष्ट्रपती भवनातील अधिकृत भेटीचा महत्त्वाचा भाग असतो. अटल बिहारी वाजपेयी, अरुण जेटली, सुषमा स्वराज यांना त्यांच्या कार्यकाळात नेहमीच निमंत्रण मिळाले. मात्र मोदी–शहा यांच्या काँग्रेसद्वेषी आणि अहंकारी भूमिकेमुळे ही प्रथा पायदळी तुडवली जात आहे. हा संवैधानिक व संसदीय परंपरांचा उघड भंग आहे.”
तिवारींचे आणखी म्हणणे असे, “सोव्हिएत रशियाने अमेरिकेच्या सातव्या ताफ्याला तोंड देण्यासाठी हिंद महासागरात युद्धनौका पाठवल्या तेव्हा भारताबरोबरची निष्ठा सिद्ध झाली. पण भाजपचे शीर्ष नेतृत्व भूतकाळात अमेरिकाधार्जिणे होते — हे ते आता विसरतात. रशियासोबतच्या रणनीतिक मैत्रीचा सारा श्रेय काँग्रेसला आहे.”
मोदींच्या रशिया दौऱ्यातील वक्तव्याचा उल्लेख करत तिवारी म्हणाले, “२०१४ पूर्वी भारत निराशा आणि हतबलतेच्या खाईत होता, असे पंतप्रधान मोदी परदेशात जाऊन सांगतात. देशाचा अपमान करणारे असे वक्तव्य ऐकून भारतीय नागरिक म्हणून मनाला वेदना होतात.”
गोपाळदादा तिवारी यांनी केंद्र सरकारवर “लोकशाही मूल्यांचा अवमान आणि विरोधकांबद्दल सातत्याने असलेली आत्मकेंद्री व अहंकारी वृत्ती” असल्याचा आरोपही केला.

