महाड – मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाडजवळील नीलकमल हॉटेल शेजारी एका महाकाय झाडाची मोठी फांदी कंटेनरवर आडवी कोसळली. सुदैवाने कंटेनर चालक बचावला, मात्र केबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मुंबई–गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणामध्ये काही अडथळा ठरणारे वृक्ष तोडण्यात आले असले, तरी नीलकमल हॉटेल शेजारील काही मोठ्या झाडांचा भाग तसाच ठेवण्यात आला आहे. या झाडाखालील अरुंद मार्गावरून गेल्या वर्षभरापासून कंटेनर चालक महमद अन्वर शहा (रा. उत्तर प्रदेश) सावधगिरीने वाहन चालवत होता. झाडाच्या फांद्या केव्हाही कंटेनरला घासतील किंवा मोठा अपघात घडेल, अशी भीती तो कायम बाळगत होता.
आज पहाटे गोव्याहून मुंबईकडे जात असताना हीच भीती खरी ठरली. कंटेनर क्रमांक MH-06 AQ 3866 झाडाखालून जात असताना मागून एक कार ओव्हरटेक करत होती. त्यामुळे कंटेनरचा वेग आणि दिशा बदलली आणि झाडाची सुमारे तीन टन वजनाची फांदी थेट कंटेनरच्या केबिनवर कोसळली. ती फांदी जवळपास 200 मीटरपर्यंत कंटेनरबरोबर फरफटत गेली. या अपघातात चालक मात्र थोडक्यात बचावला.
“गेल्या वर्षभरापासून मी या ठिकाणी फार काळजीपूर्वक वाहन चालवत आहे. आज मागून कार ओव्हरटेक करत असताना माझा कंटेनर झाडाखालून गेला आणि जी भीती वारंवार वाटत होती तीच घटना घडली,” असे चालक महमद अन्वर शहा यांनी सांगितले.
स्थानिकांच्या मते, राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या ठिकाणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. हीच फांदी एखाद्या छोट्या कारवर कोसळली असती तर जीवितहानी निश्चित झाली असती, असा संताप व्यक्त केला जात आहे.
या घटनेनंतर महामार्ग विभागाने आता तरी होशात येऊन धोकादायक झाडे व फांद्यांची तत्काळ छाटणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

