महाराष्ट्र ताज्या बातम्या

२८ जानेवारी : तोच दिवस, दोन वेगळे वास्तवं…

२८ जानेवारी २०२१.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात एक वेगळाच उत्साह होता.

महापालिका मुख्यालय : मुंबईच्या प्रशासनाचं, संघर्षाचं आणि लोकशाहीचं प्रतीक.

या ऐतिहासिक वास्तूत ‘हेरिटेज वॉक’ या उपक्रमाचा शुभारंभ झाला.

त्या वेळी 

उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते,

अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते,

आणि आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते.

कार्यक्रम औपचारिक होता.

पण त्या कार्यक्रमात जे शब्द उमटले, ते आज इतिहास झाले आहेत.

अजितदादा पवार यांनी त्या दिवशी जे सांगितलं,

ते केवळ भाषण नव्हतं—

तो एक अनुभव होता, एक कबुली होती, एक माणूसपण होतं.

“या महानगरपालिकेच्या इमारतीची संकल्पना ब्रिटिश वास्तुतज्ज्ञाची असली,

पण या इमारतीचे निवासी अभियंता आणि बांधकाम ठेकेदार दोघेही मराठी होते.

म्हणजे या इमारतीच्या उभारणीत मुख्य योगदान मराठी माणसाचं आहे.”

मुंबईसारख्या शहरात,

जिथे मराठी माणूस अनेकदा दुय्यम ठरवला जातो,

त्या इमारतीवरचा हा हक्काचा अभिमान दादांनी मोकळेपणाने व्यक्त केला.

पण त्याहून अधिक भिडणारे शब्द पुढे आले—

“मी गेली ३०–३५ वर्षे लोकप्रतिनिधी आहे.

मुंबईत येतो, राज्य शासनात काम करतो. आम्ही 

अजोय मेहता, प्रवीण परदेशी, इक्बाल सिंह चहल…

असे कितीतरी आयुक्त दिले. ते आले-गेले.

पण इतकी वर्षे कधीही मला महापालिका मुख्यालयात आत बोलावलं गेलं नाही.

आज पहिल्यांदाच आत येण्याची संधी मिळाली—

तीही आमच्या पोराने, आदित्यने दिली.”

या एका वाक्यात

राजकारण होतं,

व्यवस्थेची कोरडी वास्तवता होती,

आणि त्याच वेळी एक भावूक माणूसही दिसत होता.

आज…

२८ जानेवारी २०२६.

बरोबर पाच वर्षांनी,

तोच दिवस पुन्हा आला आहे.

पण आज अजितदादा आपल्यात नाहीत.

आज त्या ऐतिहासिक इमारतीकडे पाहताना,

त्या जिन्याकडे, त्या दालनांकडे, त्या गच्चीकडे पाहताना

दादांचे शब्द आठवतात.

राजकारणात सत्तासमीकरणं बदलतात.

मित्र-शत्रू बदलतात.

कालचे व्यासपीठ आज रिकामे होतात.

पण काही क्षण,

काही आठवणी

काळाच्या पलीकडे जातात.

या छायाचित्रांमध्ये

फक्त एक सरकारी कार्यक्रम नाही,

तर एका काळाचा दस्तऐवज आहे.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजितदादा पवार

एकाच फ्रेममध्ये,

एकाच विचारधारेत नाही कदाचित,

पण एका ऐतिहासिक क्षणात नक्कीच.

आज दादा नाहीत.

पण त्यांचे शब्द आहेत.

त्यांचा साधेपणा आहे.

आणि मुंबईवरचा त्यांचा हक्काचा अभिमान आहे.

दिवस तोच…

इमारत तीच…

पण आज दादा फक्त आठवणीत.

भावपूर्ण श्रद्धांजली,

अजितदादा पवार.

🙏

Vivek Bhavsar

About Author

विवेक भावसार (Vivek Bhavsar) गेले 30 वर्षे राजकीय आणि शोध पत्रकारिता करत आहेत. त्यांनी नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प, समृद्धी महामार्ग, तूर डाळ घोटाळा, एम आय डी सी जमीन हस्तांतरण, कोळसा खाण यासारख्या अनेक घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात