बदलापूर: बदलापूरकरांसाठी दिलासादायक बातमी असून मेट्रो ५ प्रकल्प बदलापूरपर्यंत विस्तारित करण्यास सकारात्मक दिशा मिळाली आहे. या निर्णयामुळे बदलापूरच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार असून शहराच्या औद्योगिक, व्यापारी आणि निवासी विकासाला वेग येणार आहे, अशी माहिती बदलापूरचे माजी नगराध्यक्ष व भाजप नेते राम पातकर यांनी दिली.
दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथे एमएमआरडीएचे अॅडिशनल कमिशनर अश्विनी मुदगल यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मेट्रो ५ प्रकल्प बदलापूरपर्यंत वाढवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. मेट्रो १४ प्रकल्पास होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो ५ बदलापूरपर्यंत नेण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे पातकर यांनी सांगितले.
सध्या प्रस्तावित मार्गानुसार मेट्रो ५ हा ठाणे–भिवंडी–आधारवाडी–बिर्ला कॉलेज–भवानी चौक–सुभाष चौक–गुरुदेव हॉटेल असा मार्ग घेत मेट्रो १२ ला जोडला जाणार असून, पुढे सुभाष चौक–उल्हासनगर–अंबरनाथ चिखलोली–बदलापूर रेल्वे स्टेशनपर्यंत विस्तार करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे.
सन २००९ पासून मेट्रो बदलापूरपर्यंत आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. बदलापूरकरांच्या हितासाठी केलेल्या या प्रयत्नांना आता यश येण्याची चिन्हे दिसत आहेत, असे राम पातकर यांनी नमूद केले.
राज्य शासन बदलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक असून मेट्रो प्रकल्पामुळे भविष्यातील प्रगतीचा मार्ग अधिक वेगाने खुला होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मेट्रो ५ च्या विस्तारासाठी सकारात्मक दिशा दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच महायुती सरकारचे राम पातकर यांनी अभिनंदन व आभार मानले.

