महाराष्ट्र ताज्या बातम्या

सरकारने मदत केली नाही तर निम्मे साखर कारखाने बंद पडतील : दिलीप वळसे पाटील

Dilip Walse Patil speaking in Maharashtra Assembly on sugar industry crisis

मुंबई  : राज्यातील साखर उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे ५५ ते ६० हजार कोटी रुपये इतकी असून सरकारला यामधून सुमारे ८ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. जवळपास ५० लाख शेतकरी, १० लाख ऊस तोडणी कामगार आणि दीड लाख हंगामी कामगारांची कुटुंबे या उद्योगावर अवलंबून आहेत. इतकी मोठी आर्थिक उलाढाल असलेला साखर उद्योग सध्या अडचणीत असून राज्य सरकारने तातडीने मदत केली नाही तर निम्मे साखर कारखाने बंद पडण्याची वेळ येईल, असा इशारा ज्येष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस नेते, माजी विधानसभा अध्यक्ष आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना दिला.

वळसे पाटील म्हणाले की, ‘बळीराजा सन्मान’ योजना जाहीर करण्यात आली याचे स्वागत आहे, मात्र पात्रतेचे निकष अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. शेतकऱ्यांना कर्जफेड मार्चपर्यंत करावी लागते. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय मार्चपूर्वीच घ्यावा, अन्यथा बँकांची वसुली कमी होऊन शेतकरी थकबाकीदार ठरतील, असे त्यांनी नमूद केले.

ते पुढे म्हणाले की, विदेशी गुंतवणूक प्रामुख्याने शहरांमध्येच केंद्रित आहे. ती ग्रामीण भागातही वळवली पाहिजे. मानवी विकास निर्देशांक जिल्हास्तरावर नव्हे तर तालुकास्तरावर मोजला गेला पाहिजे. ‘विकसित महाराष्ट्र’चे स्वप्न साकार करायचे असेल तर विकास सर्वदूर पोहोचला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात दिवस-रात्र विमान वाहतूक सेवा उपलब्ध होणेही आवश्यक असल्याचे त्यांनी सुचवले.

आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये आजही कुपोषण आणि आरोग्य सुविधांची कमतरता गंभीर समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. ठक्कर बाप्पा योजनेचा निधी २०२४ मध्ये ३७४ कोटी होता तो २०२५-२६ मध्ये केवळ १२ कोटींवर आला, तर अमृत आहार योजनेचा निधी २६५ कोटींवरून ६२ कोटींवर घसरल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. तसेच नऊ महिने उलटूनही विकासनिधी खर्च होत नसल्याबाबत त्यांनी सरकारचे लक्ष वेधले.

साखर उद्योगाला राज्य सरकारने मदत केली नाही तर अपेक्षित गाळप होणार नाही, साखर उत्पादन घटेल आणि सुमारे ३,३०० कोटी रुपयांचा फटका बसेल, असा इशारा देत साखर उद्योगासाठी कायमस्वरूपी धोरण तयार करण्याची मागणी वळसे पाटील यांनी केली. अन्यथा भविष्यात सरकारला मिळणारा ८ हजार कोटी रुपयांचा जीएसटी महसूलही धोक्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात