मुंबई: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) संचलित मेट्रो नेटवर्कने ३० कोटी प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा गाठला असून, मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये मेट्रोचा वाढता स्वीकार पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. ३ ऑगस्ट २०२६ रोजी हा टप्पा पार करण्यात आला. मेट्रो मार्गिका २अ, ७, २ब (पहिला टप्पा) आणि ९ (पहिला टप्पा) या मार्गिकांचा या नेटवर्कमध्ये समावेश आहे.
या टप्प्याची विशेष बाब म्हणजे शेवटचे ५ कोटी प्रवासी अवघ्या १७९ दिवसांत नोंदवले गेले. मेट्रो सेवा सुरू झाल्यापासून प्रवासीसंख्येतील ही सर्वात वेगवान वाढ मानली जात आहे. या कालावधीत सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या २.७० लाखांवरून २.७९ लाखांपर्यंत पोहोचली असून, सुमारे ३.३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. शनिवार-रविवार, सार्वजनिक सुट्ट्या आणि हंगामी प्रवासाचा परिणाम असूनही ही वाढ कायम राहिल्याचे एमएमआरडीएने म्हटले आहे.
२ एप्रिल २०२२ रोजी मेट्रो मार्गिका २अ आणि ७ सुरू झाल्यानंतर मुंबई मेट्रोच्या प्रवासीसंख्येत सातत्याने वाढ झाली. सप्टेंबर २०२३ मध्ये ५ कोटी, मे २०२४ मध्ये १० कोटी, जानेवारी २०२५ मध्ये १५ कोटी, ऑगस्ट २०२५ मध्ये २० कोटी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये २५ कोटी प्रवाशांचा टप्पा पार झाला होता. त्यानंतर केवळ सहा महिन्यांत नेटवर्कने ३० कोटी प्रवाशांचा नवा विक्रम नोंदवला.

७ एप्रिल २०२६ रोजी मेट्रो मार्गिका २ब (पहिला टप्पा) आणि मेट्रो मार्गिका ९ (पहिला टप्पा) सुरू झाल्यानंतर नेटवर्कमध्ये नऊ नवीन स्थानकांची भर पडली. त्यामुळे संपर्कक्षमता वाढली असून त्याचा थेट परिणाम प्रवासीसंख्येवर झाल्याचे दिसून येत आहे.
एमएमआरडीएच्या आकडेवारीनुसार, पहिल्या ५० लाख प्रवाशांच्या टप्प्याच्या तुलनेत आजची सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या सुमारे ९.४ पट वाढली आहे. तसेच १० कोटी ते १५ कोटी प्रवाशांच्या कालावधीच्या तुलनेत सध्याची दैनंदिन प्रवासीसंख्या २३ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. ही वाढ मुंबईतील नागरिकांचा मेट्रोकडे वाढता कल आणि सार्वजनिक वाहतुकीतील बदलती प्रवास पद्धती दर्शवित असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० कोटी प्रवाशांचा टप्पा हा आधुनिक, सुरक्षित आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मुंबईकरांनी व्यक्त केलेल्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे सांगितले. मुंबई महानगर प्रदेशात मेट्रो नेटवर्कचा विस्तार सुरू असून भविष्यात अधिक व्यापक आणि सुसंगत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या दिशेने राज्य सरकार कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री तथा एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी या यशाचे श्रेय मेट्रो सेवांचा स्वीकार करणाऱ्या मुंबईकरांना आणि प्रकल्पाच्या उभारणी व संचालनात योगदान देणाऱ्या संपूर्ण टीमला दिले. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशाला अखंड मेट्रो नेटवर्कने जोडण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त तथा महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांनी मेट्रो ही मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत असल्याचे सांगितले. सुरक्षित, विश्वासार्ह आणि जागतिक दर्जाच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हजारो अभियंते, नियोजक आणि संचालन कर्मचारी सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुंबई महानगर प्रदेशात मेट्रो नेटवर्कचा सातत्याने विस्तार होत असताना प्रवासीसंख्येतील ही वाढ केवळ वाहतूक सुविधेच्या विस्ताराचे प्रतीक नसून, नागरिकांच्या प्रवासाच्या सवयींमध्ये होत असलेल्या बदलाचीही नोंद म्हणून पाहिली जात आहे. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे, रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करणे आणि शाश्वत शहरी गतिशीलतेला चालना देणे या व्यापक धोरणात्मक उद्दिष्टांच्या दृष्टीने ३० कोटी प्रवाशांचा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे.

