पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आयुक्तांना खरमरीत पत्र…!
Twitter: @NalavadeAnant
मुंबई: गणेश उत्सव आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला असताना केवळ पर्यावरण पूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा याकरीता महापालिकेतर्फे गणेशमूर्तींवर विविध प्रकारचे शिक्के मारण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र गणेश उत्सव हा लाखो हिंदूंचा आस्थेचा विषय असल्याने या निर्णयाऐवजी दुसरा पर्याय शोधावा, अशा आशयाचे खरमरीत पत्रच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सोमवारी येथे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना लिहून त्यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.
“गणेश उत्सव हा अतिशय आस्थेचा विषय आहे. विशेषतः मुंबईत या उत्सवाचे विशेष महत्व असून प्रत्येक व्यक्ती गणेशाच्या मूर्तीला पवित्र मानून त्याची मनोभावे पूजा करतो. त्यामुळे उत्सव काळात कोणाच्याही श्रद्धेला धक्का लागणार नाही याची बारकाईने काळजी घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर मूर्तींवर शिक्का मारणे किंवा रंग देणे योग्य नाही! यामुळे लाखो हिंदूंच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. पर्यावरणपूरक आणि इतर मूर्तींमधील फरक समजावा यासाठी मूर्तीवर कोणत्याही प्रकारची रंगरंगोटी किंवा शिक्केबाजी नको, त्याऐवजी दुसरा पर्याय शोधण्याबाबत मी स्वतः महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याशी बोललो आहे.” असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.