Twitter: @therajkaran
नागपूर: सध्याचे महायुती सरकार हे पक्ष फोडून स्थापन झालेले सरकार आहे. कायदा- सुव्यस्थेचे धिंडवडे निघाले असून सर्वाधिक दंगली या सरकारच्या काळात झाल्या. एक तासाला एक या पेक्षा अधिक शेतकरी शेतमजूर या प्रमाणानुसार एक वर्षात २२ हजार सातशे ४६ आत्महत्या कर्जबाजारीपणा, दिवाळखोरीमुळे झाल्या. अवकाळी पाऊस, दुष्काळाशी चार वर्षे शेतकरी झुंजत आहे. आरोग्ययंत्रणा कोलमडली आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशा घोषणा करणाऱ्यांचा दृष्टिकोन आता नकारात्मक आहे. दुष्काळ जाहीर करण्यात दिरंगाई होत आहे. बोगस बियाण्यांचा काळाबाजार होत आहे. एनसीआरबी अहवालानुसार महाराष्ट्रात, त्यामध्ये सर्वाधिक नागपुरात अशा २ हजार पाचशे ४३ चोऱ्या झाल्या. उपराजधानीत तर कायदा सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झाला असून संत्रा नगरी म्हणून प्रसिद्ध असलेले शहर आता चोरांची नगरी म्हणून ओळखली जाण्याचा धोका आहे. चोर- चोर मावसभाऊ, तिजोरी लुटून खाऊ, अशी स्थिती आहे, असे घणाघाती आरोप करीत विरोधी पक्षांनी आज हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार जाहीर केला. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी येथे महाविकास आघाडी नेत्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
विधानसभा विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी यावेळी सरकारने शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करावी, अशी मागणी करताना हे सरकार कठपुतली सरकार आहे, यांच्या दोऱ्या दिल्लीच्या हाती आहेत, विरोधकांना संपविण्याचे काम केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ते म्हणाले, या राज्यात कोण सुरक्षित आहे. विश्वंभर चौधरी यांची सभा उधळली गेली. २०१२ पासून राज्यात गुटखाबंदी असताना एक हजार कोटींचा गुटखा विकला जातो. आरक्षणाचा खेळ खंडोबा केला जात आहे. मराठे-ओबीसींत, धनगर-आदिवासींमध्ये भांडणे लावण्यात येत आहेत. इम्पिरियल डाटा गोळा करा, जातीनिहाय जनगणना (caste census) निर्णय अंमलात आणा अशी मागणीही वडेट्टीवार यांनी यावेळी केली.
विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आरोप केला की, मराठवाडा – विदर्भ विकासाच्या फक्त गप्पा मारल्या जातात, कांदा, सोयाबीन, कापूस ही पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्यांवर, माता भगिनींवर अन्याय होत आहेत. तरुणांना ड्रग्जचे व्यसन लावण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांचे कॅबिनेट मंत्र्यांवर नियंत्रण नाही. सरकारी खर्चाने स्वतःचा प्रचार करण्यात येतो, असा आरोपही दानवे यांनी केला.
ओबीसी -मराठा आंदोलने सरकार पुरस्कृत आहे, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर दिले. भ्रष्टाचार करणाऱ्यांची यादी मोठी आहे. ती सभागृहात जाहीर करु, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. चहापान हा ही इव्हेंट झाला आहे, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (शरद पवार) जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना (उद्धव ठाकरे) प्रतोद सुनिल प्रभू, शेतकरी कामगार पक्षनेते जयंत पाटील, आमदार राजेश राठोड हे उपस्थित होते.
Also Read: हिवाळी अधिवेशनचा वेळ वाया घालवण्याचा उबाठा गटाचा कट