भाजप नेते संतोष गांगण यांची दिल्लीत केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्याशी बैठक
दिल्ली : कोकणातील फळ प्रक्रिया उद्योगांना केंद्र सरकारकडून अधिक मदत मिळावी यासाठी भाजप नेते संतोष गांगण यांनी दिल्लीत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांची भेट घेतली. या भेटीत काजू, आंबा, फणस, जांभूळ, करवंद, कोकम, नारळ इत्यादी कोकणातील फळांवर आधारित प्रक्रिया उद्योगांच्या सशक्तीकरणावर सविस्तर चर्चा झाली.
संतोष गांगण यांनी सांगितले की, “कोकणात तयार होणारे मेंगो पल्प, कोकम सरबत, आंबा वडी, फणस पोळी, खोबऱ्याच्या वड्या, विविध फ्लेवरचे काजूगर आदी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. जानेवारी २०२५ मध्ये नोयडा येथे आयोजित ‘इंडस फूड’ प्रदर्शनात याची प्रचिती आली असून, राजापूर तालुक्यातील रायापाटण येथील ‘कोकण बाग ऍग्रोटूरिझम फार्मर प्रोड्युसर कंपनी’ने सहभाग घेतला होता आणि तेथे मिळालेल्या ऑर्डर्सचा पुरवठा सध्या सुरू आहे.”
गांगण यांनी या भेटीत मंत्री चिराग पासवान यांच्याशी पीएमएफएमइ योजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची मागणी केली. यामध्ये भांडवली सहाय्य वाढवणे, अन्न प्रक्रिया क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानास प्रोत्साहन, मिनी क्लस्टर योजनेतील सबसिडी वाढविणे, कोकणात नवीन मिनी फूड पार्क उभारणे, तसेच खाजगी उद्योगांसाठी व्यवसाय उष्मायन केंद्रांना (Incubation Centres) सध्या मिळणारी ३५% अनुदान वाढवून ६०% पर्यंत करावी, अशा विविध बाबींचा समावेश होता.
या सर्व मागण्यांवर मंत्री पासवान यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना तातडीने माहिती मागवण्याच्या सूचना दिल्या. “कोंकणातील फळ प्रक्रिया उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्य मिळवून देण्याचा निर्धार आहे,” असे संतोष गांगण यांनी सांगितले.