महाड – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील मुगवली येथील उड्डाणपुलावर सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याचे समोर आले आहे. पावसाळा सुरु होत असताना रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे या भागात गंभीर वाहतूक कोंडीची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदारांकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
हा महामार्ग कोकणात जाणारा एकमेव महत्त्वाचा मार्ग असून गेली १७ वर्षे हा रस्त्याचा प्रकल्प रखडलेला आहे. काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून दरवर्षी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राज्यातील मंत्र्यांकडून ‘महामार्ग लवकरच पूर्ण होईल’ अशा घोषणा फक्त कागदावर राहतात. प्रत्यक्षात मात्र पावसाळा सुरू होताच रस्त्याची अवस्था दयनीय होते, खड्डे पडतात आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.
मुगवली उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना — मुंबईकडून रत्नागिरीकडे व रत्नागिरीहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गांवर — सिमेंट काँक्रिट रस्त्याला मोठ्या प्रमाणावर तडे पडले आहेत. या भेगांमध्ये पावसाचे पाणी साचल्यास रस्त्याचा भाग खचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे रस्ता तुटून दोन भागांत विभागला जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की, प्रवासादरम्यान अनेक वाहनांचे पार्ट्स खराब होत असून काही वाहने तर रस्त्यातच बंद पडतात. अपघातांचे प्रमाणही वाढले असून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
गणेशोत्सवात अडचणी वाढणार
ऑगस्ट महिन्यात येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो. अशा वेळी महामार्गावरची ही तुटक व उखडलेली रचना मोठ्या वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरू शकते. याचा फटका चाकरमानींसह स्थानिकांना देखील बसण्याची शक्यता आहे.
एका महिन्यापासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असली, तरी आता जोरदार पावसाळा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावरील तडे, खड्डे आणि निकृष्ट कामामुळे यंदाही गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या नागरिकांना ‘खड्डेवाटेने’ प्रवास करावा लागेल, अशी चिंता प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे.