मुंबई– एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीत सुधारणा आणि प्रशासनाचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, महामंडळात ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच सुरु होणार असून, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी यासंदर्भातील परिपत्रक नुकतेच काढले आहे.
शनिवारी प्रसारित केलेल्या निवेदनात महामंडळाने स्पष्ट केले की, हे पाच प्रादेशिक विभाग स्वतंत्र कार्यालये स्थापन करून कार्यान्वित होणार आहेत.
२०१६ पासून एसटी महामंडळाच्या नियोजन व पणन खात्यांतर्गत विविध नियंत्रण समित्यांचे कार्यालय बंद करण्यात आले होते. मात्र, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अलीकडील कर्नाटक दौऱ्यादरम्यान तिथल्या परिवहन व्यवस्थेच्या विकेंद्रीकरणाच्या संकल्पनेने प्रेरित होऊन, महाराष्ट्रातील एसटी महामंडळालाही प्रादेशिक विभागांत विभाजित करण्याची गरज त्यांनी मांडली.
सध्या एसटीची त्रिस्तरीय रचना – आगार (तालुका स्तर), विभागीय कार्यालय (जिल्हा स्तर) आणि मध्यवर्ती कार्यालय (राज्य स्तर) – कार्यरत आहे. मात्र, महसूल विभागाप्रमाणे सहा प्रशासकीय विभागांचा या यंत्रणेत समावेश नव्हता. त्यामुळे अनेक निर्णयांसाठी थेट मध्यवर्ती कार्यालयाशी संवाद साधावा लागत असे, ज्यामुळे नियोजनात विलंब होत होता आणि त्याचा परिणाम एसटीच्या महसुलावर होत असे.
या पार्श्वभूमीवर, ‘नियंत्रण, नियोजन आणि समन्वय’ या त्रिसूत्रीवर आधारित पाच प्रादेशिक विभागांची रचना करण्यात आली असून, मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर आणि अमरावती हे विभाग व त्यांची मुख्यालये निश्चित करण्यात आली आहेत.
प्रत्येक प्रादेशिक विभागासाठी आवश्यक त्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक गरजेनुसार नियोजन करता यावे, प्रवाशांना अधिक चांगली, सुरक्षित आणि वेळेत सेवा देता यावी यासाठी यंत्रणा सज्ज होईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
यासाठी उपाध्यक्ष डॉ. माधव कुसेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने अंमलबजावणी सुरू करण्याचे निर्देश दिल्याचेही मंत्री सरनाईक यांनी नमूद केले.