राज्यातील तब्बल १७.८५ लाख हेक्टर क्षेत्र बाधित; शेतकऱ्यांनी धैर्य सोडू नये – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई: “ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यांतील पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल. शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असा विश्वास कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज व्यक्त केला.
पावसाचे थैमान : ३० जिल्ह्यांत हानी
गेल्या दोन महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ऑगस्ट–सप्टेंबरमधील पावसामुळे तब्बल ३० जिल्ह्यांतील १९५ तालुक्यांमध्ये ६५४ महसूल मंडळांतील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.
बाधित क्षेत्रफळ
• एकूण बाधित क्षेत्र: १७,८५,७१४ हेक्टर (४२,८४,८४६ एकर)
• मुख्य नुकसान: खरीप पिकांचे (सोयाबीन, मका, कापूस, डाळी व भाजीपाला)
सर्वाधिक बाधित जिल्हे (हेक्टरमध्ये):
• नांदेड – ७,२८,०४९
• यवतमाळ – ३,१८,८६०
• वाशीम – २,०३,०९८
• धाराशिव – १,५७,६१०
• अकोला – १,७७,४६६
• बुलढाणा – ८९,७८२
• सोलापूर – ४७,२६६
बाधित पिके
• मोठे नुकसान: सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग
• इतर फटका बसलेली पिके: भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी, हळद
बाधित जिल्ह्यांची यादी
नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे.