मुंबई : कोल्हापूरच्या हत्तीणीचा प्रश्न, दादरच्या कबुतरांमुळे निर्माण झालेले प्रदूषण, आणि बांद्र्यातील वाघाच्या हालचाली—या साऱ्यांचे हाताळण करताना महायुती सरकारची अवस्था अक्षरशः ‘सर्कस’सारखी झाली आहे, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते आणि माजी आमदार प्रा. अनंत गाडगीळ यांनी केली आहे.
प्रा. गाडगीळ म्हणाले, “सर्कशीत तारेवरची कसरत हे आकर्षण असते. कोल्हापूरच्या हत्तीणी आणि वनतारातील ‘अंबारी’ दोन्ही सांभाळताना महायुती सरकारची तारेवरची कसरत सुरू आहे.”
कबुतरांच्या प्रश्नावर दुटप्पीपणाचा आरोप
वैज्ञानिक आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी संशोधनातून सिद्ध केले आहे की कबुतरांमुळे माणसाच्या फुफ्फुसाला गंभीर धोका असतो. न्यायालयानेही यावर बंदी घातली असतानाही दादरमध्ये एका समुदायाकडून कबुतरांना दाणे टाकून न्यायालयाच्या निर्णयाला विरोध केला जातो, मात्र सरकार ठोस कारवाई करत नाही. याउलट पुण्यात गणपती मंडळांवर त्वरित खटले दाखल होतात, यातून सरकारचा दुटप्पीपणा दिसतो, असा आरोप गाडगीळ यांनी केला.
“काँग्रेस अल्पसंख्यांकांच्या दबावाखाली झुकते असा आरोप करणाऱ्या भाजपने, अल्पसंख्यांकातील एका समुदायाच्या आर्थिक ताकदीपुढे शरणागती पत्करली आहे. यातून भाजपचा दुतोंडी चेहरा उघड झाला,” असे ते म्हणाले.
मंत्र्यांच्या वक्तव्यांवर टोला
सर्कशीत विदूषकाने काही बोलले की रिंग मास्टर फटका देतो, त्याप्रमाणेच राज्यातील मंत्र्यांची वर्तने आणि वक्तव्यांनंतरचे चित्र दररोज दिसते, असा टोला गाडगीळ यांनी लगावला.
’लाफ्टर क्लब’चा उपरोधीक हल्ला
“बांद्र्यातील वाघाच्या आसन व्यवस्थेवर ‘सिंहासनावर’ बसलेले प्रतिक्रिया देऊ लागल्यामुळे महायुती सरकारने स्वतःला ‘लाफ्टर क्लब’च बनवले आहे,” अशी टोकाची टिप्पणी प्रा. गाडगीळ यांनी केली.