उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांचा त्रिसूत्रीवर भर
मुंबई: गेल्या काही दिवसांच्या आजारपणानंतर उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पुन्हा जोमाने विकास प्रकल्प व योजनांच्या आढावा बैठका सुरू केल्या. या बैठकीत त्यांनी महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक मंदिर परिसरातील विकास कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
अजित पवार यांनी ठामपणे सांगितले की, मंदिरांच्या मूळ रचनेला धक्का न लावता प्रत्येक कामाला हेरिटेज टच देण्यात यावा. भाविकांना दर्जेदार सोयी उपलब्ध करून देतानाच या विकास आराखड्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळेल आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल.
मयुरेश्वर (मोरगाव), चिंतामणी (थेऊर), विघ्नेश्वर (ओझर), महागणपती (रांजणगाव), वरदविनायक (महड), सिद्धिविनायक (सिद्धटेक) आणि बल्लाळेश्वर (पाली) या सात मंदिरांच्या परिसरात सुरू असलेली कामे ठरलेल्या मुदतीत व दर्जेदार रीतीने पार पाडावीत, अशी सूचना त्यांनी दिली. स्थानिक रहिवाशांचे योग्य पुनर्वसन करून मंदिर परिसर मोकळा करावा, विसंगत बांधकामे काढून टाकावीत आणि आपत्कालीन परिस्थितीत अॅम्ब्युलन्स व अग्निशमन दलाची वाहने सहज पोहोचतील अशी मार्गव्यवस्था करावी, असेही त्यांनी आदेश दिले.
पर्यटनाच्या संदर्भात अजित पवार यांनी नमूद केले की, महाराष्ट्राकडे प्रचंड संधी आहे. केरळ आणि ओडिशाच्या धर्तीवर विदेशी पर्यटक, परराज्यातील भाविक आणि नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी आधुनिक सोयीसुविधा, उच्च दर्जाच्या सेवा आणि पर्यटनाभिमुख उपक्रमांची अंमलबजावणी तातडीने केली पाहिजे.
ही आढावा बैठक मंत्रालयातील समिती कक्षात झाली. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय मुंबईचे संचालक तेजस गर्गे, पुण्याचे सहायक संचालक विलास वाहणे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांच्यासह विविध जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.