महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाडमध्ये मुसळधार पावसाने पूरजन्य परिस्थितीचा धोका; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

गेल्या दोन दिवसांपासून संततधार; सावित्रीसह अन्य नद्या तुडुंब भरून वाहू लागल्या

महाड : मे महिन्यातच सुरू झालेला मान्सून आता पूर्ण ताकदीने कोसळू लागला असून, गेल्या दोन दिवसांपासून महाड शहर व परिसरात मुसळधार पावसाने कहर केला आहे. सततच्या पावसामुळे तालुक्यातील सावित्री, गांधारी आणि काळ या नद्या धोक्याच्या पातळीवर पोहोचल्या असून, त्यामुळे पूरजन्य परिस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सतत मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असून त्याचा थेट परिणाम महाड तालुक्यात जाणवू लागला आहे. दरवर्षी पावसाळ्यात महाडमध्ये पूरस्थिती उद्भवत असते आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, यंदाही नागरिकांमध्ये काळजीचं वातावरण आहे.

प्रशासन सज्ज, आपत्कालीन व्यवस्थापन सक्रिय

महाड प्रशासनाने संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय करण्यात आली असून, शहरातील संभाव्य पूरप्रवण भागांवर लक्ष ठेवले जात आहे. शहरात काही ठिकाणी झालेल्या बेकायदेशीर उत्खनन व माती भरावामुळे नदीचं पाणी अनियमितपणे वळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दस्तुरी नाका ते नातेखिंड मार्गावर पाण्याचा निचरा न झाल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले होते, तर गांधार पाले परिसरात नदीचं पाणी घरांमध्ये शिरल्याने पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. यामुळे शेतजमिनींना मोठं नुकसान झालं आहे.

१८९ मिमी पावसाची नोंद; महाबळेश्वर-रायगड भागातही मुसळधार पाऊस

महाड तालुक्यात केवळ दोन दिवसांत १८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर, किल्ले रायगड व वाळण खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असून, त्या पाण्याचा प्रभाव सावित्री नदीमार्गे महाड शहरावर जाणवतो आहे. प्रशासनाने या भागांवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे.

शाळांना सुट्टी; परिस्थिती उद्याही गंभीर होण्याची शक्यता

हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी महाड तालुक्यातील शाळांना तात्काळ सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, महाबळेश्वर व वाळण खोऱ्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास उद्या देखील पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाने नाकारलेली नाही.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात