मुंबई: राज्यात शेतकरी कर्जमाफी जाहीर करणे आजची निकड आहे, पण भाजप युती सरकार हे मुद्दाम टाळाटाळ करत आहे, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी टिळक भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. निवडणुकीच्या वेळी कर्जमाफीचं आश्वासन देऊन मतं मिळवली, सत्ता मिळवली… आणि आता निर्लज्जपणे सांगतात, ‘आम्ही कर्जमाफीबद्दल बोललोच नाही!’ लाडक्या बहिणींना दरमहा ₹२१०० देण्याचंही वचन दिलं होतं, पण तेही पाळलं नाही. सरकारला हे जमत नसेल, तर “खुर्च्या खाली करा,” असा इशारा त्यांनी दिला.
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी जाब विचारल्यावर त्यांना दमबाजी करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना सपकाळ म्हणाले, “ही दादागिरी चालणार नाही. तुम्ही जनतेचे सेवक आहात, मालक नाही, हे लक्षात ठेवा.”
कर्जमाफीसाठी आता समित्या नेमल्या जात आहेत, पण आश्वासन देताना त्याची आठवण झाली नव्हती. राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला नव्हता का? सातबारा कोरा करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, पण अदानी-अंबानींसाठी हजारो कोटी कुठून येतात? शेतकरी व भगिनींसाठी निधी हवा असतो, तेव्हा तिजोरी आठवते का? अशा प्रश्नांची सरबत्ती करत सपकाळ यांनी सरकारला चांगलंच फैलावर घेतलं.
“राज्यातील भाजप युती सरकार केवळ अदानी-अंबानींसाठी पायघड्या घालण्यात मग्न आहे. शेतकरी व राज्यातील महिलांना देण्यासाठी मात्र चालढकल केली जाते. सुरजागड खाणीतील मलई, समृद्धी महामार्गातील भ्रष्टाचार, घोडबंदर-भाईंदर बोगदा, पुणे रिंग रोड, आणि शक्तीपीठाच्या नावाखाली अदानींच्या फायद्यासाठी कोट्यवधींचा मलिदा खाल्ला जातोय. सत्ता उपभोगताना मलई खाण्याचं काम सुरू आहे, मग शेतकरी व बहिणींना पैसे देण्यासाठी पैसा कुठे जातो?” असा संतप्त सवालही त्यांनी केला.
“जर राज्य सरकारकडे पैसा नसेल, तर दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून राज्यासाठी भरीव निधी आणा, ती हिंमत दाखवा. समित्यांचा खेळ थांबवा. शेतकरी कर्जमाफी आणि ₹२१०० अनुदान तातडीने जाहीर करा. जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका, अन्यथा त्याची मोठी किंमत मोजावी लागेल,” असा गंभीर इशारा सपकाळ यांनी सरकारला दिला.