विमान सेवा बंद; भारतात परतण्यासाठी मदतीची मागणी
ठाणे: इराण–इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर परिणाम झाला असून, ठाणे जिल्ह्यातील कल्याण, शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील २३ नागरिक दुबईत अडकले आहेत. हे सर्व नागरिक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी पर्यटनासाठी दुबईला गेले होते आणि आज भारतात परतण्याचे नियोजन होते. मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे त्यांचे विमान रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या गटामध्ये १२ ज्येष्ठ नागरिक आणि १२ महिला असून त्यांच्यासोबत टूर मॅनेजरचाही समावेश आहे. विमान सेवा तात्पुरती स्थगित झाल्यामुळे हे सर्व नागरिक दुबईत थांबले असून भारतात परतण्यासाठी मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दुबईत अडकलेल्या नागरिकांपैकी रमेश धलपे यांनी सांगितले की, या संदर्भात भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन व मदतीची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, परिस्थितीवर लक्ष ठेवून संबंधित यंत्रणा आवश्यक ती पावले उचलतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

