किल्ले रायगड : पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या खर्डी–नेवाळी–हिरकणीवाडी रस्त्याचे काम झाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच रस्ता वाहून गेला आहे. रायगड प्राधिकरणाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानिकांच्या सूचना दुर्लक्षित करून ठेकेदाराच्या हितासाठी रस्ता आखल्याचा आरोप होत असून, यामुळे कोट्यवधी रुपयांचा अपव्यय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाड–रायगड २४ किमी रस्त्याव्यतिरिक्त वाहतूक कोंडी टाळण्यासाठी खर्डी गाव ते नेवाळी–हिरकणीवाडी मार्ग तयार करण्यात आला. मात्र या मार्गावर डोंगर चढणारे तीव्र उतार व अरुंद वळणे असून त्यामुळे मोठ्या वाहनांची वाहतूक अशक्य झाली. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी या मार्गावरून जाणे टाळले.
रस्त्याची गटारे, मोऱ्या निकृष्ट दर्जाच्या असून, पावसात चार वेळा रस्ता वाहून गेला. डोंगर उतारांवर योग्य तांत्रिक उपाय न करता केलेल्या कामामुळे सरकारचा पैसा वाया गेला, तर ठेकेदार मात्र मालामाल झाल्याची चर्चा आहे.
नेवाळी गावाजवळ तीव्र उतार व धोकादायक वळणांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. आता या भागात दुरुस्ती सुरू असून रस्ता तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. याशिवाय, स्थानिकांनी सुचवलेल्या पर्यायांना दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
“आम्ही पर्याय सुचवला होता, मात्र कोणी ऐकलं नाही. त्यामुळे ही अवस्था उद्भवली,” असे येथील नागरिक यशवंत आखाडे यांनी सांगितले.
हा रस्ता पर्यटनासाठी होता की ठेकेदारांच्या फायद्यासाठी, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.