महाराष्ट्र ताज्या बातम्या

कर्जमाफी, पीकविमा, जनसुरक्षा कायदा रद्द आणि नवा रेल्वे मार्ग – भाकपाच्या जिल्हा अधिवेशनात ठराव; ९ जुलैला जिल्हाभर सत्याग्रह

परभणी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या २५व्या जिल्हा अधिवेशनात शेतकऱ्यांना सर्वंकष कर्जमाफी लागू करावी, एक रुपयात पीकविमा योजना लागू करावी, जनसुरक्षा विधेयक रद्द करावे, गायरान आणि देवस्थान जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात, आणि मानवत-पाथरी-सोनपेठ-परळी हा नवीन रेल्वेमार्ग तत्काळ सुरू करावा अशा ठरावांचे एकमताने अनुमोदन करण्यात आले. या मागण्यांच्या समर्थनार्थ दि. ९ जुलै रोजी भाजप सरकारच्या शेतकरी-विरोधी आणि कामगार-विरोधी धोरणांचा निषेध करत जिल्हाभर सत्याग्रह आंदोलन छेडण्याचा निर्णय या अधिवेशनात घेण्यात आला.

हे अधिवेशन परभणीत १५ जून २०२५ रोजी कॉ. गोविंद पानसरे सभागृह (औषधी भवन) येथे संपन्न झाले. अधिवेशनाचे उद्घाटन भाकपाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीतील कॉ. अभय टाकसाळ (छ. संभाजीनगर) यांनी केले. व्यासपीठाला “कॉ. गोविंद पानसरे विचार मंच” हे नाव देण्यात आले आणि प्रतिगामी शक्तींविरुद्ध संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला.

या अधिवेशनात जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला. ३५ सदस्यांची नवी जिल्हा कौन्सिल निवडण्यात आली. माधुरी क्षीरसागर यांची जिल्हा सरचिटणीस, ओंकार पवार आणि शेख अब्दुल यांची सहसचिव म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

चार्वाक दर्शन मंडळाचे संयोजक सुरेश इखे यांनी “सुरजागड येथील खाण प्रकल्पाच्या नावाखाली १ लाख २३ हजार झाडांची कत्तल करून पर्यावरणाचा विनाश केला जात आहे” असा आरोप केला. तसेच शक्तीपीठ महामार्गाचा झटका शेतकऱ्यांवर येतोय, याचाही तीव्र शब्दांत निषेध केला.

भाकपाचे सचिव मंडळ सदस्य कॉ. राजन क्षीरसागर यांनी भाजपा सरकारवर टीका करताना म्हटले की, “हे सरकार शेतकरी आणि कामगारविरोधी धोरणे राबवीत असून अमेरिकेच्या दबावाखाली परराष्ट्र आणि व्यापार धोरणे बदलत आहे.” अदानीसारख्या कॉर्पोरेट गटांच्या हितासाठी परराष्ट्र धोरण बदलण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

अधिवेशनात पारित केलेले अन्य ठराव पुढीलप्रमाणे होते: जनसुरक्षा विधेयक रद्द करा, सक्तीची हिंदी लादणारे नवे शैक्षणिक धोरण रद्द करा, मोबाईल गेमिंग व ऑनलाइन जुगारावर बंदी घाला, सिंचन व पाणीवाटपातील भेदभाव थांबवा

कार्यक्रमाचे संचालन मुंजाभाऊ लिपणे, शेख अब्दुल, ओंकार पवार आणि सय्यद अझहर यांनी केले. मागील तीन वर्षांचा अहवाल माधुरी क्षीरसागर यांनी सादर केला.

जिल्हा कौन्सिलमध्ये निवड झालेले काही सदस्य:
लक्ष्मण काळे, प्रसाद गोरे, देविदास खरात, वर्षा चव्हाण (परभणी), मुंजाभाऊ लिपणे, नवनाथ कोल्हे (पाथरी), मधुकर गाडेकर (जिंतूर), बाळासाहेब सोनावणे (सोनपेठ), सय्यद इब्राहीम (सेलू), योगेश फड (गंगाखेड), रमेश साठे (मानवत), नरहरी काळे (पूर्णा), संजय शेळके (पालम) यांच्यासह पाच जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात