महाराष्ट्र ताज्या बातम्या

दरड कोसळण्याच्या शक्यतेमुळे महाड-भोर-पंढरपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद; वरंधा घाटाची दुरुस्ती नेमकी किती काळ चालणार?

महाड: महाड ते पुणे जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीडीवरील वरंधा घाट मार्ग पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या संभाव्य धोक्यामुळे आगामी तीन महिन्यांसाठी वाहतुकीस बंद ठेवण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. मात्र, या मार्गाचे रुंदीकरण व डागडुजीची प्रक्रिया किती काळ चालणार? आणि तो पुन्हा कधी सुरू होणार? असा सवाल स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमधून सातत्याने उपस्थित केला जात आहे.

महाड, भोर व पंढरपूरला जोडणाऱ्या या मार्गाचे रुंदीकरण मागील तीन वर्षांपासून सुरू असून, विशेषतः वरंधा घाटातील काम अद्याप पूर्ण झालेले नाही. परिणामी या मार्गावरील वाहतूक आणि एसटी बससेवा वारंवार बंद केली जात असून, स्थानिक नागरिकांचे हाल वाढले आहेत. २०२१ मध्ये पारमाची, माझेरी गावाजवळ रस्ता खचला होता आणि त्यानंतर दरड कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.

पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी १६ जुलै २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार, राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीडीवरील राजेवाडी ते वरंधा-भोर- महाड मार्ग १ जून २०२५ ते २८ सप्टेंबर २०२५ दरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. दरडप्रवण क्षेत्रांमध्ये अपघाताचा धोका लक्षात घेऊन ही खबरदारी घेतली जात आहे. हवामान खात्याच्या रेड किंवा ऑरेंज अलर्ट नसल्यास हलक्या वाहनांना परवानगी दिली जाऊ शकते, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

या दरम्यान प्रवाशांसाठी पुण्याकडे जाण्यासाठी माणगाव-निजामपूर-ताम्हिणी घाट-मुळशी-पिरंगुट-पुणे मार्ग, तर कोल्हापूरकडे जाण्यासाठी पोलादपूर-महाबळेश्वर-वाई-सातारा-कराड-कोल्हापूर किंवा खेड-चिपळूण-पाटण-कराड मार्ग पर्यायी म्हणून वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मात्र गेली तीन वर्षे हा घाट पावसाळ्यात बंद ठेवला जात असल्याने स्थानिक रहिवाशांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या मार्गावरून जाणाऱ्या एसटी बससेवाही बंद झाल्यामुळे लोकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे शासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता, व प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हा रस्ता नेमका केव्हा पूर्ण होणार? आणि दरवर्षी पावसाळ्यातच का बंद होतो? यावर शासनाचे मौन का? असा सवाल आता अधिक जोरात विचारला जात आहे. स्थानिक जनतेच्या रोजगार, आरोग्यसेवा, शिक्षण यांसारख्या मूलभूत गरजांवर या बंदीचा थेट परिणाम होत असल्याने, शासनाने तातडीने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात