मुंबई : परदेशात राहून हस्तकांमार्फत भारतात अंमली पदार्थांचे कारखाने चालवून मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या चार आरोपींचे प्रत्यार्पण करून त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात लेखी उत्तराद्वारे दिली.
आमदार अमोल खताळ यांच्यासह इतर पाच सदस्यांनी राज्यात, विशेषतः पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात अंमली पदार्थांविरोधात कारवाई करण्यासाठी अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स (ANTF) स्थापन करण्यात आली असून तिची सात युनिट्स कार्यरत आहेत.
सन २०२५ मध्ये ANTF आणि पोलिसांनी मिळून ५२३ कोटी १७ लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ नष्ट केले, तर १३४० कोटी ४१ लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. या कालावधीत ३६५९ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
तसेच PITNDPS Act 1988 अंतर्गत राज्यात सहा आरोपींना स्थानबद्ध करण्यात आले आहे. अंमली पदार्थ प्रकरणात सहभाग आढळल्याने अहिल्यानगर येथील एका पोलीस हेड कॉन्स्टेबलला सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहितीही लेखी उत्तरात देण्यात आली आहे.
Stay Ahead in Maharashtra Politics

