महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session : झुडपी जंगल हस्तांतरणाचा निर्णय; ‘गरिबांना बेघर करणार नाही’ – महसूलमंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई : विदर्भातील सहा जिल्ह्यांतील झुडपी जंगलं वनक्षेत्र घोषित करून ती जमीन वनविभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय जरी घेतला असला, तरी शासन कोणत्याही गरिबाला बेघर होऊ देणार नाही, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली.

ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा नियम १०५ अन्वये लक्षवेधी सूचना मांडली होती. जून २०२५ मध्ये महसूल विभागाकडून ८६ हजार हेक्टर जमीन वनविभागाला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. यामुळे राज्य सरकारच्या डिनोटिफिकेशन निर्णयाला धक्का बसला असून, लाखो कुटुंबे बेघर आणि भूमिहीन होण्याची भीती पटोले यांनी व्यक्त केली.

या निर्णयामुळे सहा जिल्ह्यांमध्ये विकासकामे करणे अशक्यप्राय होईल, रोजगाराच्या संधी निर्माण होणार नाहीत, उद्योगधंदे येणार नाहीत आणि बेरोजगारी वाढेल, असे पटोले म्हणाले. स्थानिक जनतेत तीव्र असंतोष आहे. झुडपी जंगल क्षेत्र घोषित केल्याने पट्टा मिळत नाही आणि पट्टा नसेल तर घरकुल बांधता येत नाही, हे वास्तव पटोले यांनी सभागृहात मांडले.

“नागपूर उच्च न्यायालयाची वास्तू ज्या भागात आहे, तो भागसुद्धा झुडपी जंगल म्हणून दाखवण्यात आला आहे,” असे उदाहरण देऊन त्यांनी शासनाच्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली.

यावर उत्तर देताना महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की, १९९६ पूर्वीचे अतिक्रमण असलेल्या जमीनीची यादी केंद्र सरकारकडे पाठवली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून यावर निर्णय घेतला जाईल. न्यायालयाच्या निकालातील संदिग्ध बाबींबाबत ॲडव्होकेट जनरल यांचे मत घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात