मुंबई: बांगलादेशी घुसखोरीमुळे स्थानिक मराठी फेरीवाले, कोळी समाज आणि पारंपरिक व्यवसायांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा सभागृहात ठामपणे मांडण्यात आल्याची माहिती आमदार चित्रा किशोर वाघ यांनी दिली.
महापौरांच्या भूमिकेबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की, महापौरांची जबाबदारी केवळ पाणी, मीटर किंवा गटार व्यवस्थेपुरती मर्यादित नसून मुंबईचा सामाजिक व सांस्कृतिक पाया असलेल्या कोळी, आगरी आणि भंडारी समाजाच्या उपजीविकेचे संरक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
दादर परिसरात 2020 नंतर मोठ्या प्रमाणात बाहेरून आलेल्या फेरीवाल्यांची संख्या वाढल्याची तक्रार स्थानिकांकडून होत आहे. स्थानिक मराठी भाजी विक्रेत्यांना, विशेषतः पालघर, वसई आणि सफाळा येथून येणाऱ्या विक्रेत्यांना जागा न मिळणे, हप्ते वसुलीचे प्रकार आणि संरक्षणाचा अभाव याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
दादरमधील तथाकथित “झिरो नंबर” प्रकरणाचा उल्लेख करत काही व्यक्तींवर रोहिंग्या समुदायासाठी निधी उभारणी केल्याचे आरोप झाले होते. या संदर्भात प्रश्न विचारणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याची बाबही त्यांनी मांडली.
जनता मार्केट हे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात मराठी फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन म्हणून उभारण्यात आले होते. मात्र, सध्या तेथील व्यापाऱ्यांच्या रचनेत मोठा बदल झाल्याची तक्रार स्थानिकांकडून होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
काही फेरीवाल्यांच्या ओळखपत्रांबाबत शंका व्यक्त करत आधार कार्डवरील एकसारख्या जन्मतारखांबाबत चौकशीची मागणी करण्यात आली. यासंदर्भात सखोल तपास करून तथ्य समोर आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
अनधिकृत मच्छी विक्रेत्यांमुळे पारंपरिक कोळी महिलांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रारही त्यांनी व्यक्त केली. वाढत्या स्पर्धेमुळे पारंपरिक बाजार व्यवस्था विस्कळीत होत असल्याचे मत त्यांनी मांडले.
या पार्श्वभूमीवर बांगलादेशी घुसखोरीच्या मुद्द्यावर कठोर आणि परिणामकारक उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे आमदार चित्रा किशोर वाघ यांनी सांगितले. मुंबईचा इतिहास, संस्कृती आणि स्थानिकांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्यासाठी ठोस कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

