मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा अभिनव उपक्रम
मुंबई: आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी पायी वारी करत असतात. त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि दूरदृष्टीतून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे ‘चरणसेवा’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांतून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसह उपचार आणि ‘चरणसेवा’साठी सुमारे पाच हजार वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सांस्कृतिक आणि आरोग्यसेवेचा संगम
आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व अध्यात्मिक परंपरेचा गाभा आहे. वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सज्ज आहे. ‘चरणसेवा’ उपक्रमाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, पॅरामेडिकल स्टाफ, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच स्वयंसेवक यांचा समावेश असून, विविध ठिकाणी सेवा दिली जात आहे.
पायांना विश्रांती, वारकऱ्यांना दिलासा
वारकऱ्यांच्या दररोजच्या दीर्घ पल्ल्याच्या पायवाटेनंतर त्यांच्या पायांतील थकवा, सूज, जळजळ, तळपायातील वेदना यावर तत्काळ आणि शास्त्रोक्त उपचार देण्यात येत आहेत. फिजिओथेरपीच्या माध्यमातून त्यांना विश्रांती आणि आराम मिळावा, हा या सेवेमागचा मुख्य उद्देश आहे.
सरकारी योजनांची माहितीही दिली जाते
या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती देखील दिली जात आहे, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.
भक्ती विठोबाची – सेवा आरोग्याची!
वारकऱ्यांच्या दिंडीसाठी एकूण ४३ मुक्काम ठिकाणी ‘चरणसेवा’ दिली जात असून, त्या ठिकाणी सुसज्ज वैद्यकीय तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. ही सेवा स्थानिक आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्था तसेच शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयाने राबवली जात आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे सक्रिय सहकार्यही या उपक्रमाला लाभत असल्याचे रामेश्वर नाईक यांनी सांगितले.