महाराष्ट्र ताज्या बातम्या

परभणी पुतळा तोडफोड आणि बीड सरपंच हत्या प्रकरण: न्यायालयीन चौकशी आणि एसआयटी स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

नागपूर: परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या तोडफोडीच्या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचार, बीड जिल्ह्यातील सरपंचाच्या निर्घृण हत्येसह खंडणी वसुलीच्या संघटित गुन्हेगारी प्रकरणांची न्यायालयीन चौकशी होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. या प्रकरणांवर एसआयटीमार्फत (विशेष तपास पथक) चौकशी होईल, तसेच बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची तातडीने बदली केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, “परभणी पुतळा तोडफोड प्रकरणातील आरोपी दत्तराव सोपानराव पवार हा मनोरुग्ण आहे. त्याच्यावर २०१० पासून उपचार सुरू होते. या घटनेचा संबंध त्या दिवशी निघालेल्या सकल हिंदू समाज मोर्चाशी नाही. पवार याने मोर्चा संपल्यानंतर पाच तासांनी पुतळ्याची तोडफोड केली. परिणामी शहरात वातावरण बिघडले. काही आंदोलकांच्या हिंसक वागण्यामुळे पोलीस कारवाई झाली, आणि व्हिडिओतील पुराव्यांच्या आधारावरच संबंधितांवर कारवाई करण्यात आली.”

मुख्यमंत्र्यांनी पोलीस निरीक्षक अशोक घोडमान यांच्यावर अतिबळ वापर केल्याबद्दल निलंबनाची कारवाई जाहीर केली. तसेच परभणी घटनेतील कोठडीत मृत झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याला आधीपासूनच श्वसनाचा आजार असल्याचे सांगण्यात आले.

बीड सरपंच हत्या प्रकरण:
मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष अप्पा देशमुख यांच्या निर्घृण हत्येबद्दल सांगितले की, “आवाडा ग्रीन एनर्जी प्रकल्पातून खंडणी वसूलीला विरोध केल्यामुळे देशमुख यांचे अपहरण करून त्यांना अमानुष मारहाणीत ठार मारले गेले. या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव पुढे आले असून, या घटनेचा संबंध परभणी घटनेशी आहे का, याचाही तपास केला जाईल. दोषींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मपोका) कठोर कारवाई केली जाईल.”

सरपंच देशमुख व कोठडीत मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधी पक्षांना सभागृहात बोलण्याची परवानगी न मिळाल्याने संतप्त सदस्यांनी सभात्याग केला.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात