महाराष्ट्र ताज्या बातम्या

Raigad : धोकेदायक आंबेत आणि टोळ पुलाचे भवितव्य अंधारात!

नव्या पुलाच्या उभारणीसाठी निधीचा घोळ, लोकप्रतिनिधींची उदासीनता

महाड – कोकणचे सुपुत्र आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. बॅ. ए. आर. अंतुले यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेले आंबेत आणि टोळ पूल आज धोकादायक परिस्थितीत असून त्यांचे भवितव्य अंधारात आहेत. कालबाह्य झालेल्या या पुलांची नव्याने उभारणी आवश्यक असूनही स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे केवळ तात्पुरत्या दुरुस्तीवरच कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत.

या दोन्ही पूलांवरून रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ (पूर्वीचा १७) जातो. याच मार्गावरील सावित्री नदीवरील पूल २ ऑगस्ट २०१६ रोजी कोसळला होता. त्यात एसटीसह खासगी वाहनांमधील ३५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनानंतर राज्यातील सर्व धोकादायक पुलांचे अंडरवॉटर सर्वेक्षण करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने दिले होते. मात्र नऊ वर्षांनंतरही या अहवालाचे काय झाले, हे गुलदस्त्यातच आहे.

दरम्यान, पुण्याच्या कुंडमळा भागातील इंद्रायणी नदीवरील साकव कोसळल्यानंतर सरकारची झोप उडाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यानंतर सरकारने सर्व पुलांचे पुनर्परीक्षण करण्याचे आदेश दिले. यामध्ये पूलांच्या लांबीवर आधारित जबाबदाऱ्या विभागल्या असून, निधीच्या वापराबाबतही स्पष्ट आदेश आहेत. मात्र, त्या १०% राखीव निधीचा वापर किती पुलांवर झाला, हे संशोधनाचा विषय आहे.

आंबेत पुलाला ४७ वर्षे पूर्ण झाली असून, २०१७-१८ मध्ये त्याची तात्पुरती दुरुस्ती झाली. मात्र २०१९ मध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या बोटीच्या धडकेत एक खांब सरकल्याने पूल अधिकच धोकादायक झाला. अखेर दोन वर्षांनी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून २७ जून २०२१ रोजी पालकमंत्री आदिती तटकरे, अनिल परब आणि खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत या पुलाचे लोकार्पण झाले.

टोळ व दादली पूलही ४० वर्षांहून अधिक जुने झाले असून, फक्त दादली पुलाच्या नव्या कामाला मान्यता मिळालेली आहे. आंबेत व टोळ पूलांच्या नव्याने उभारणीसाठी अद्याप निधी मंजूर झालेला नाही. राज्य की केंद्र सरकार यापैकी कोण निधी देणार, याबाबत स्पष्टता नाही. या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधीही मौन बाळगून असल्याचे चित्र आहे.

नवीन पूल उभारणीला किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याने मंजुरीसाठी लागणारा वेळ आणि निधी कोण देणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले हे पूल नागरिकांसाठी जीवनवाहिनी असून, निधीअभावी त्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागणार असल्याची चर्चा आता नदीकाठच्या गावांत उघडपणे होऊ लागली आहे.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात