मुंबई : राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सव २०२६ (National Students’ Film Festival – NSFF 2026) हा दोन दिवसीय महोत्सव २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी मुंबई विद्यापीठ, कलिना येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडला. राष्ट्रीय कला मंच (RKM), अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि विद्यार्थी निधी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवात देशभरातील तरुण चित्रपट निर्मात्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. विविध भाषांतील आणि विविध शैलींतील चित्रपटांचे प्रदर्शन, मार्गदर्शनपर सत्रे, मास्टरक्लास आणि विचारमंथनपर चर्चांमुळे हा सिनेमा प्रवास प्रेरणादायी ठरला.
उद्घाटन सत्र सुप्रसिद्ध दिग्दर्शक रवी उद्यावर, राज कांबळे, पायल किनाके, अभिनव दीप आणि सौम्या चौरे यांच्या उपस्थितीत पार पडले.
ज्यूरी ब्रिफिंग सत्रात निधी सिंह धर्मा, अमरनाथ झा, राहुल सुहास, नीरज कुमार मिश्रा, वंदिता चक्रदेव आणि विशाल चतुर्वेदी यांनी मार्गदर्शन केले. माध्यमांची भूमिका, बदलते सिनेमा विश्व आणि जबाबदार कथनशैली यावर त्यांनी विचार मांडले.
महोत्सवासाठी एकूण ३० चित्रपटांची निवड करण्यात आली होती. हे सर्व चित्रपट दोन दिवसांत प्रदर्शित करण्यात आले आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चार मास्टरक्लासचे आयोजन करण्यात आले. अभिजीत देशपांडे यांनी पटकथा लेखनावर मार्गदर्शन केले, सुदीप लाहिरी यांनी नव्या तंत्रज्ञानावर चर्चा केली, केदार गायकवाड यांनी तांत्रिक पैलूंवर भाष्य केले, तर व्ही. एन. आदित्य यांनी सिनेमाची नैतिकता आणि भविष्यावर विचार मांडले.
विशेष पॅनेल चर्चेत “AI आणि भारतीय सिनेमाचे भविष्य” या विषयावर पूजा कदम आणि अविनाश त्रिपाठी यांनी चर्चा केली.
समारोप सोहळ्यात महर्षि शाह, आशिष चौहान, तरुण राठी, अंकित शुक्ला आणि सुनील पाटील उपस्थित होते.
पुरस्कार वितरणात –
सर्वोत्कृष्ट चित्रपट: पानपंख
विशेष प्रशंसा: सोंगटी, सीझ
सर्वोत्कृष्ट संगीत: सांझा कुआं
सर्वोत्कृष्ट संपादन: रिहा
सर्वोत्कृष्ट युवा दिग्दर्शक: बाप रे बाप
आशादायी आवाज: द क्व्यू
समारोप “वंदे मातरम्” गीताने करण्यात आला.

