मुंबई : मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी १०० दिवसांचा प्राधान्यक्रम आराखडा तयार केला असून त्यातील सात महत्त्वाच्या उपक्रमांची अंमलबजावणी अवघ्या एका महिन्यात सुरू करण्यात आली आहे.
११ फेब्रुवारी २०२६ रोजी महापौरपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रशासन अधिक परिणामकारक, पारदर्शक आणि गतिमान करण्यावर भर देण्यात आल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने दिली.
मुंबईच्या पहिल्या नागरिक म्हणून कार्य करताना महिला सक्षमीकरण, आरोग्य सेवा, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणाऱ्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे.
महापौरांनी सांगितले की, १०० दिवसांच्या आराखड्यातील एकूण २१ मुद्द्यांवर काम सुरू असून त्याची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. पारदर्शक आणि नागरिककेंद्रित प्रशासन देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या आराखड्यात पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित महत्त्वाच्या उपाययोजनांचा समावेश आहे.
महापौर पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अल्पावधीतच काही महत्त्वाच्या उपक्रमांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये महानगरपालिकेच्या सर्व सामग्रीची खरेदी GeM पोर्टलमार्फत करण्याची प्रक्रिया, मुंबई अधिक स्वच्छ करण्यासाठी समुदाय स्तरावर स्वच्छता स्पर्धांचे आयोजन, पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम, तसेच पाणी तुंबण्याच्या समस्येवर उपाय म्हणून ब्रिमस्टोवॅड-२ प्रकल्पाची अंमलबजावणी आणि त्यासाठी आयआयटी मुंबई अभ्यासगटाची नेमणूक यांचा समावेश आहे.
तसेच पात्र फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी हॉकिंग झोन तयार करण्यासाठी शहरी फेरीवाला समिती गठीत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून सर्व पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोडसह परवाना व ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम, मुंबई-नवी मुंबई प्रवेशद्वार उभारणी, तसेच वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानासाठी आशियाई सिंह मिळविण्यासाठी गुजरात सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती महापौरांनी दिली.

