राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी – मोठा क्रांतिकारी निर्णय
मुंबई : रस्त्यावर राहणाऱ्या भटक्या, एकल, अनाथ आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित मुलांच्या पुनर्वसनासाठी महिला व बालविकास विभागाने ‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत “फिरते पथक” योजना संपूर्ण राज्यात राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या योजनेतून अशा मुलांना समुपदेशन, शिक्षण, आरोग्यसेवा, व्यावसायिक मार्गदर्शन व पुनर्वसन दिले जाणार आहे. २०२२-२३ पासून प्रायोगिक तत्त्वावर मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि मुंबई उपनगर या सहा महानगरपालिका क्षेत्रांमध्ये योजना यशस्वीरीत्या राबवण्यात आली होती. त्या अनुभवाच्या आधारावर आता राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये ही योजना अंमलात आणली जाणार आहे.
“रस्त्यावरची मुले ही केवळ सरकारची नव्हे, तर संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यांच्यासाठी शिक्षण, आहार, वैद्यकीय सेवा आणि सामाजिक सुरक्षा देणारी ‘फिरते पथक’ योजना ही सेवा नसून बदलाची चळवळ आहे. प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, हेच योजनेचे खरे यश ठरेल,” — असे भावनिक प्रतिपादन तटकरे यांनी यावेळी केले.
राज्यातील ३१ “फिरते पथक” व्हॅन्स कार्यान्वित करण्यासाठी ८ कोटी रुपयांचा आर्थिक प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या व्हॅन्सद्वारे समुपदेशन, प्राथमिक शिक्षणात प्रवेश, आरोग्य तपासणी, पुनर्वसन व व्यसनमुक्ती इत्यादी सेवा दिल्या जातील. पुढील टप्प्यात नगरपरिषद क्षेत्र, धार्मिक स्थळे व देवस्थानांमध्येही ही सेवा विस्तारण्याचा सरकारचा मानस आहे.
पथकाच्या प्रमुख सेवा पुढीलप्रमाणे:
• मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन
• वयानुसार अंगणवाडी किंवा शाळेत प्रवेश
• अनाथ व एकल मुलांना बालगृहात दाखल करणे
• व्यसनमुक्ती, कुपोषण व शारीरिक आजारांवर उपचार
• पौगंडावस्थेतील मुलांसाठी व्यावसायिक थेरपी सेवा
• शासकीय योजनांची माहिती व लाभ
या संपूर्ण उपक्रमासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेतले जाणार असून, रस्त्यावर राहणाऱ्या व वंचित मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या आयुष्यात उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याच्या दिशेने ही योजना एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचा ठाम विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.